Join us  

Birthday Special : लग्न झालेल्या या अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती रिना रॉय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 5:50 PM

रिना रॉय आणि या अभिनेत्याची प्रेमकथा त्याकाळी मीडियात चांगलीच गाजली होती.

ठळक मुद्देरिना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांची प्रेमकथा एकेकाळी चांगलीच गाजली होती. त्या दोघांनी हीरा-मोती, बेरेहम, नसीब, विश्वनाथ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. शत्रुघ्न आणि रिना यांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडायची.

रिना रॉय यांचा आज वाढदिवस असून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक भूमिका साकारल्या आहेत. रिना रॉय या गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहेत. पण आजही त्यांच्या भूमिका लोकांच्या स्मरणात आहेत. रिना यांनी १९७२ ला जरुरत या चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. रिना यांचा चित्रपटसृष्टीत कोणताच गॉडफादर नव्हता. पण तरीही त्यांनी चित्रपटसृष्टीत छोट्या-मोठ्या भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये त्यांचे स्थान निर्माण केले. 

रिना रॉय यांच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले. रिना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांची प्रेमकथा एकेकाळी चांगलीच गाजली होती. त्या दोघांनी हीरा-मोती, बेरेहम, नसीब, विश्वनाथ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. शत्रुघ्न आणि रिना यांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडायची. रिना यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा काम केले, त्यावेळी त्या केवळ १९ वर्षांच्या होत्या तर शुत्रुघ्न त्यांच्यापेक्षा ११ वर्षांनी मोठे होते. पहिल्याच चित्रपटापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली. ते दोघे लग्न करणार असे वाटत असतानाच शत्रुघ्न यांनी पूनमसोबत लग्न केले. लग्नानंतर देखील शत्रुघ्न यांच्या आयुष्यात रिना यांचे स्थान कायम होते. रिना आणि त्यांच्या नात्याविषयी शत्रुघ्न यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते.

शत्रुघ्न यांनी स्टारडस्ट या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले होते की, तुम्ही पूनमसोबत लग्न केले त्यावेळी रिना तुमच्या आयुष्यात होत्या का? त्यावर त्यांनी उत्तर दिले होते की, मला लग्न करताना खूपच भीती वाटत होती. मी त्यावेळी कोणताही निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नव्हतो. खरे तर शेवटच्या क्षणापर्यंत मी माझा हा निर्णय मागे घ्यावा असेच मला वाटत होते. लग्न मुंबईत होते, पण मी त्या वेळात लंडन मध्ये होते. मी अगदी लग्नाला काही तास असताना विमान पकडून मुंबईत आलो होतो. पूनमला तर वाटलं होतं की, मी लग्नासाठी येणार नाही. मी अगदी ऐनवेळी येऊन लग्न केले होते. आमच्या नात्यात माझ्याकडून अनेकवेळा चुका झाल्या, पण तरीही पूनमने मला नेहमीच साथ दिली.

याच मुलाखतीत रिना यांच्यावर तुमचे इतके प्रेम होते तर त्यांच्यासोबत लग्न का केले नाही हे देखील विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी सांगितले होते की, लग्न हे कोणत्याही समस्येवर उत्तर होऊ शकत नाही. मी लग्नानंतरही रिनाला लोकांच्या समोर भेटत होतो. आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. अनेक गोष्टीत रिना माझा सल्ला घेत असे. लग्नानंतर मी तिच्याकडे दुर्लक्ष करणे मला पटत नव्हते. मी तिला एका पार्टीत भेटलो तर त्यावरून मीडियात लिहिण्यात आले. त्या बातमीत इतके देखील म्हणण्यात आले होते की, रिनामुळेच मी पूनमला त्या पार्टीत नेले नव्हते. हे खरे तर पूर्णपणे चुकीचे होते. मी समाजाच्या दबावामुळे कोणताही निर्णय घेतला नाही. माझ्या मनाचे ऐकूनच मी निर्णय घेतला होता. 

खामोशः द शत्रुघ्न सिन्हा या शत्रुघ्न सिन्हा यांच्या बायोग्राफीमध्ये देखील शत्रुघ्न आणि रिना यांच्या अफेअरचा उल्लेख करण्यात आला आहे.

टॅग्स :रीना रॉयशत्रुघ्न सिन्हा