Join us  

अनुराग कश्यप भडकला; डिस्ट्रिब्युटर्सने परवानगीविना गाळले ‘मनमर्जियां’तील वादग्रस्त दृश्य!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 7:37 PM

अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘मनमर्जियां’ वरून निर्माण झालेला वाद तूर्तास तरी थांबण्याची चिन्हे नाहीत.

अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘मनमर्जियां’ वरून निर्माण झालेला वाद तूर्तास तरी थांबण्याची चिन्हे नाहीत. ‘मनमर्जियां’च्या एका सीनवर शिख समुदायाने ओक्षप घेतला आहे. हा सीन शिख समुदायाच्या भावना दुखावणारा असल्याचे सांगत आरटीआय कायकर्ते गुरविंदर चड्ढा यांनी याप्रकरणी एफआयआरही दाखल केला आहे. अभिषेक बच्चन आणि तापसी पन्नू गुरुद्वारातून बाहेर पडल्यानंतर सिगारेट ओढतात, असा हा सीन आहे. शिख समुदायाने हा सीन चित्रपटातून गाळण्याची मागणी केली होती. अनुरागने हा सीन चित्रपटातून गाळला नाही. पण सोशल मीडियावर यासंदर्भातला एक खुलासा देत, माफी मागितली होती. पण त्याने माफी मागितल्यानंतर लगेच चित्रपटातून हा सीन गाळण्यात आला. होय, चित्रपटातील हा सीन इरोज इंटरनॅशनल या डिस्ट्रीब्युशन कंपनीने अनुरागच्या परवानगीशिवाय गाळला. विशेष म्हणजे,याबाबत अनुरागला कुठलीही माहिती दिली गेली नाही. अनुरागला हे कळले तेव्हा साहजिकच त्याचा संताप अनावर झाला. सोशल मीडियावर त्याने आपला हा संताप बोलून दाखवला.

 ‘माझे हे ट्विट हटवले जाईल, त्याआधी अभिनंदन. अशाप्रकारे पंजाबच्या साऱ्या समस्या सुटल्या आणि पंजाबचे युवक बचावले. लाला लँडमध्ये येऊन आनंदी आहे. पुढच्यावेळी तुम्हाला कुठल्याही चित्रपटावर आक्षेप असेल तर इरोज नाऊच्या किशोर लुल्ला यांना थेट फोन करा. समस्या एका मिनिटांत कशी सोडवायची, हे ते सांगतील,’ असे त्याने लिहिले. या ट्विटमध्ये अनुरागने किशोर लुल्लाचा पर्सनल नंबरही शेअर केला. ट्विटरने हा मोबाईल नंबर हटविण्याच्या मागणी केली. पण अनुरागने त्यास नकार दिला. यानंतर ट्विटरने ते ट्विट डिलिट केले.एकंदर काय तर ‘मनमर्जियां’च्या निमित्ताने अनुराग आणि इरोस इंटरनॅशनलमध्ये जुंपली. आता हा वाद कुठल्या स्तराला जातो, ते कळेलच.

 

टॅग्स :अनुराग कश्यपमनमर्जियां