Join us  

एक नाही, दोन कंगना; दुसरी मला...! अनुराग बासू असं का बोलला?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 4:54 PM

होय, कंगनाच्या आत दोन पर्सनॅलिटी आहेत, असे अनुराग बासू म्हणाला.

ठळक मुद्देकंगना राणौत पुन्हा एकदा तिच्या पूर्ण सिक्युरिटीसहीत नव्या वर्षाच्या ठिक आधी मुंबईत परतली आहे. कंगनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत आणि तिची टिवटिव याबद्दल न बोललेले बरे. कंगना बोलली आणि त्याची हेडलाईन झाली नाही, असे अभावानेच घडते. परखड स्वभावासाठी ओळखली जाणारी कंगना यावरून अनेकदा वाईट पद्धतीने ट्रोलही होते. पण पर्वा करेन ती कंगना कुठली? याच कंगनाबद्दल दिग्दर्शक अनुराग बासू याने एक हैराण करणारे मत मांडले आहे. होय, कंगनाच्या आत दोन पर्सनॅलिटी आहेत, असे अनुराग बासू म्हणाला.तुम्हाला ठाऊक असेलच की 2006 साली अनुराग बासू याने दिग्दर्शित केलेल्या ‘गँगस्टर’ या सिनेमातूनच कंगनाने डेब्यू केला होता. दोघेही चांगले मित्र आहेत. आताश: मात्र मी पाहिलेली कंगना ही नाहीच, असे अनुरागला वाटतेय.  

एका ताज्या मुलाखतीत अनुरागने कंगनासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. त्याने सांगितले, ‘2006 मध्ये गँगस्टर या सिनेमासाठी मी 20 ते 25 मुलींचे ऑडिशन घेतले होते. पण त्या मुलींपैकी फक्त कंगनाचा चेहराच माझ्या लक्षात राहिला. कारण तिच्यात काही वेगळे होते. मी व कंगना फार भेटत नाही. पण जेव्हाकेव्हा ती मला भेटते, ती एकदम वेगळी असते. माझ्या मते, दोन कंगना आहेत आणि दुस-या कंगनाला जणू मी ओळखतच नाही.’ कंगनाला सुरुवातीला गाईड करावे लागायचे. पण ती खूप तल्लख बुद्धीची आहे. गँगस्टरदरम्यान मी तिचा हा गुण पाहिला आहे, असेही तो म्हणाला.

कंगना पुन्हा मुंबईत...

कंगना राणौत पुन्हा एकदा तिच्या पूर्ण सिक्युरिटीसहीत नव्या वर्षाच्या ठिक आधी मुंबईत परतली आहे. कंगनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ती तिच्या परिवारासोबत मुंबई एअरपोर्टवर दिसत आहे आणि तिच्या चारही बाजूने सिक्युरिटी तैनात दिसत आहे. मात्र तिची सुरक्षा आधीपेक्षा कमी झाल्याची दिसत आहे. कंगना ही गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरूनही तिने काही अपमानकारक पोस्ट शेअर केल्या होत्या. ज्यावरून तिला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. ट्विटर यूजर्ससहीत अनेक बॉलिवूड कलाकारांनीही तिला ट्रोल केले होते. दिलजीत दोसांज आणि कंगनातील ट्विटर वॉर अजूनही चर्चेचा विषय आहे. दरम्यान याआधी जेव्हा कंगना मुंबईत आली होती तेव्हा तिला झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. पण आता ती सुरक्षा काढून घेतल्याचे दिसते.

टॅग्स :कंगना राणौत