Join us  

Veeru Devgan Death: मुंबईत आल्यानंतर अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांच्यावर आली होती टॅक्सी धुण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 3:08 PM

वीरू देगगण हे मुळचे पंजाबचे होते. त्यांना बॉलिवूड चित्रपटांची प्रचंड आवड असल्याने त्यांनी बॉलिवूडमध्ये करियर करण्याचे ठरवले.

ठळक मुद्देअखेर पोट भरण्यासाठी वीरू देवगण यांनी टॅक्सी धुवायचे काम करायला सुरुवात केली. त्यानंतर कारपेंटर म्हणून देखील ते काम करत असत. त्याच दरम्यान ते विविध स्टुडिओमध्ये जाऊन काम शोधत असत.

वीरू देवगण यांनी बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्शन डायरेक्टर, दिग्दर्शक, निर्माते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे आज सकाळी निधन झाले असून विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. वीरू देवगण यांना हृदयविकाराचा झटका आल्याने सांताक्रूजमधील सूर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वीरू देगगण हे मुळचे पंजाबचे होते. त्यांना बॉलिवूड चित्रपटांची प्रचंड आवड असल्याने त्यांनी बॉलिवूडमध्ये करियर करण्याचे ठरवले. त्यांच्या तीन मित्रांसोबत त्यांनी मुंबईत येण्याचे ठरवले होते. पण रेल्वेत प्रवास करण्यासाठी तिकिटाची गरज असते हे देखील त्यावेळी त्यांना माहीत नव्हते. त्यामुळे विरारमध्ये तिकीट तपासनीसने त्यांना पकडले. दंड भरण्यासाठी देखील पैसे नसल्याने त्यांना कोर्टासमोर सादर करण्यात आले. पण दंडाची रक्कम देणे शक्यच नाहीये हे त्यांनी कोर्टात सांगितल्यावर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. 

कारागृहात असताना तिथल्या जेलरने तिथून बाहेर पडल्यानंतर कोळीवाड्यामध्ये जाऊन राहाण्याविषयी त्यांना सुचवले. तिथले लोक त्यांना मदत करतील असे त्या जेलरने त्यांना सांगितले होते. पण तिथे त्यांना कोणीच मदत केली नाही. अखेर पोट भरण्यासाठी त्यांनी टॅक्सी धुवायचे काम करायला सुरुवात केली. त्यानंतर कारपेंटर म्हणून देखील ते काम करत असत. त्याच दरम्यान ते विविध स्टुडिओमध्ये जाऊन काम शोधत असत. पण आपला चेहरा काही नायकासारखा नाहीये. त्यामुळे आपल्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार नाही याची त्यांना जाणीव झाली. त्यामुळे ते अमृतसराला परत गेले. तिथे परतल्यावर आता त्यांनी टॅक्सी चालवावी असे त्यांच्या काकांना वाटत होते. पण त्यांना ही गोष्ट पसंत नव्हती आणि त्यामुळे ते पुन्हा मुंबईत परतले.

 

मुंबईत आल्यानंतर वीरू देवगण यांना अनिता या चित्रपटात स्टंटमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि तिथून त्यांच्या करियरला सुरुवात झाली. त्या काळातील प्रसिद्ध फाईट मास्टरमध्ये वीरू देवगण यांची गणना केली जात असे. त्यांनी १९७४-१९९९ या काळात बॉलिवूडमध्ये काम केले. ते गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहेत. 

वीरु यांच्या पत्नीचे नाव वीणा असून त्यांना चार मुले आहेत. त्यांचा मुलगा अजय देवगणने त्यांचे अभिनेता बनण्याचे स्वप्न पूर्ण केल्याचे त्यांनी अनेक मुलाखतीत सांगितले होते. 

टॅग्स :अजय देवगण