Join us  

एक्स-बॉयफ्रेन्डचा पलटवार; आता काय उत्तर देणार नेहा कक्कर?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 12:50 PM

नेहा कक्कर आणि हिमांश कोहली यांच्या अफेअरपेक्षा त्यांचे ब्रेकअप अधिक गाजतेय.

ठळक मुद्देनेहाने सोशल मीडियावर पोस्ट लिहून हिमांशला ताकीद दिली होती.

नेहा कक्कर आणि हिमांश कोहली यांच्या अफेअरपेक्षा त्यांचे ब्रेकअप अधिक गाजतेय. होय, म्हणायला वर्षभरापूर्वी या दोघांचे ब्रेकअप झाले. पण या वर्षभरात नेहा सतत ब्रेकअपवर बोलली. हिमांशने वर्षभर मौन बाळगले. पण काही दिवसांपूर्वी त्यानेही तोंड उघडले. ती नॅशनल टीव्हीवर रडली आणि मी विलन झालो, असे तो म्हणाला. त्याच्या या आरोपाने नेहा चांगलीच भडकली आणि तिनेही माझ्या नावाचा वापर बंद कर नाहीतर...अशा शब्दांत त्याची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला. पण नेहाच्या या धमकीवजा इशा-याचा   हिमांशवर कदाचित फार परिणाम झालेला नाही. कारण त्याने पुन्हा ‘इशारों इशारों में’ नेहाला टार्गेट केले आहे.

होय, हिमांशने नुकतीच एक पोस्ट शेअर केली. यात त्याने एक फोटोही शेअर केला. ‘केवळ एकच गोष्ट तुम्हाला आनंदी ठेवू शकते, ती म्हणजे जसे आहात तसे खुश राहा. ना की लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात...’, असे हिमांशने या पोस्टमध्ये लिहिले. हिमांशने या पोस्टमध्ये नेहाचे नाव घेतलेले नाही. पण त्याचा इशारा तिच्याचकडे आहे, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही.

काय म्हणाली होती नेहा

नेहाने सोशल मीडियावर पोस्ट लिहून हिमांशला ताकीद दिली होती. तिने  पोस्टमध्ये लिहिले होते, ‘जे लोक वाईट बोलतात. ते माझ्यासाठी अजिबात महत्त्वाचे नाहीत.  ते खोटारडे आणि माझ्यावर जळणारे आहे. चर्चेत राहण्यासाठी हे लोक माझ्या नावाचा वापर करतात. यापूर्वीही असे झाले आणि आता माझ्या मागून माझ्या नावाचा वापर त्यांनी चालवला आहे. स्वत: काम करा आणि प्रसिद्धी मिळवा. माझ्या नावाचा वापर करू नका.’ती पुढे लिहिते होते,‘ मी तोंड उघडले तर तुझी आई, बाबा आणि बहीण सर्वांचे खरे चेहरे जगाच्या समोर येतील. त्यांनी माझ्यासोबत जे केले, मला जे काही बोलले, ते सर्व मी जगाला सांगेन. माझ्या नावाचा वापर करण्याची हिंमत करु नकोस. जगासमोर मला खलनायिका बनवून तू बिचारा होण्याचा प्रयत्न करु नकोस. मी, माझे नाव आणि माज्या कुटुंबापासून दूर रहा, ही तंबी समज’

काय म्हणाला होता हिमांश कोहली 

नेहा कक्करचा एक्स बॉयफ्रेन्ड हिमांश कोहलीने नुकतीच बॉम्बे टाइम्सला मुलाखत दिली. यावेळी त्यो नेहावर अनेक आरोप केले होते. तो म्हणाला होता, ‘माझ्याकडून हे वाईट ब्रेकअप झाले नव्हतेच. पण चर्चा सुरु झाल्या आणि सगळ्या  गोष्टी बिघडायला लागल्या. तो काळ माझ्या आयुष्यातील सर्वाधिक वाईट काळ होता. आता मी त्यातून बाहेर आलो आहे. पण त्यावेळी लोकांच्या नजरेत मी विलेन ठरलो. मला सोशल मीडियावर अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल केले गेले. कुणालाही रिअल स्टोरी माहित नाही आणि तरीही मला सरसकट खलनायक ठरवले गेले. ती टीव्हीवर रडली आणि लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवला. सगळा दोष माझ्या माथ्यावर फोडून ती नामनिराळी राहिली. मी सुद्धा बोलावे, असे मला अनेकदा वाटले. पण मी योग्य वेळेची प्रतीक्षा करायचे ठरवले. माझा तो निर्णय अगदी योग्य होता. कारण कालांतराने माझ्या मनातला राग कमी झाला. शेवटी एकेकाळी ज्या व्यक्तिवर मी जीवापाड प्रेम केले, तिच्याविरोधात मी कसा काय बोलू शकतो. ती माझ्या प्रेमाची व्याख्या नव्हती. तू माझ्यासोबत असे का केलेस, हा प्रश्न मी तिला कधीच केला नाही. पण या सगळ्यामुळे मी प्रचंड हर्ट झालो.’ 

टॅग्स :नेहा कक्करहिमांश कोहली