यावेळी सरोजिनी यांनी, या हत्येमागे खूप मोठे षडयंत्र रचले गेल्याचेही म्हटले. त्यांच्या मते, या प्रकरणात काही तेलगू राजकारण्यांचाही सहभाग आहे. जेव्हा माझ्या मुलीची हत्या झाली तेव्हा मला याबाबतची फारशी कल्पना नव्हती. सरोजिनी यांनी सांगितले की, जर त्यांना त्यावेळी याबाबतची भनक लागली असती तर तिच्या गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत तिच्यावर मी अंतिम संस्कार केले नसते. खरं तर मला कधीच माझ्या मुलीच्या बॉयफ्रेंडला विरोध नव्हता. उलट मी त्यांच्यातील जवळीकतेला होकार दिला होता. त्याचबरोबर लग्नाअगोदर दोघांनी त्यांच्या करिअरकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही दिला होता.
२००२ मध्ये हे प्रकरण तेव्हा वादाच्या भोवºयात सापडले होते जेव्हा गांधी रुग्णालयाचे फॉरेंसिक एक्सपर्ट मुणिस्वामी यांनी प्रत्युषाच्या शवाची तपासणी केली होती. त्यावेळी त्यांनी प्रत्युषाची हत्या झाल्याची शंका उपस्थित केली होती. जुन्या रिपोर्टनुसार, प्रत्युषाचा मृत्यू तिच्या गळ्यावर दबाव पडल्यामुळे झाला होता. त्यावेळी असेदेखील समोर आले होते की, प्रत्युषाच्या शरीरावर वीर्य पडलेले होते. ज्यामुळे तिचा बलात्कार झाला असावा, अशी शक्यता वर्तविली गेली. आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाने याप्रकरणी सीबीआयला चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत प्रत्युषाने आत्महत्या केल्याचा निर्वाळा देण्यात आला होता. त्याचबरोबर प्रत्युषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या बॉयफ्रेंडला दोषी ठरविण्यात आले होते. न्यायालयाने सहा हजार रुपयांचा दंड ठोठावताना त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती.