Join us  

कुठे गायब आहेत 'संस्कारी बाबूजी' आलोक नाथ, अभिनेत्री नारायण शास्त्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 11:39 AM

'आम्ही त्यांच्या घरी जायचो तेव्हा...' आलोक नाथ यांच्याबद्दल नारायणी शास्त्रीने अनेक खुलासे केले आहेत.

ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ (Alok Nath) यांची मनोरंजनविश्वात 'संस्कारी बाबूजी' अशी ओळख आहे. अनेक मालिका, सिनेमांमध्ये त्यांनी वडिलांची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. मात्र आलोक नाथ २०१८ साली वेगळ्यच कारणाने चर्चेत आले होते. 'मी टू' मोहिमेंतर्गत काही महिलांनी त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. यामुळे त्यांची संस्कारी बाबूजी या प्रतिमेलाच धक्का लागला. अनेकांना या आरोपांमुळे आश्चर्य वाटले होते. तर आता सध्या आलोक नाथ नक्की कुठे आहेत याचा खुलासा अभिनेत्री नारायण शास्त्रीने (Narayani Shastri) केला आहे.

मराठी तसेच हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री नारायण शास्त्रीने नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. यावेळी तिने वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या. आलोक नाथ यांच्यासोबतही तू काम केलं आहेस असा जेव्हा सिद्धार्थने उल्लेख केला तेव्हा लगेच नारायणी म्हणाली, 'आय लव्ह हिम.'

आलोक नाथ यांच्यावरील आरोपांवर ती म्हणाली, "मला खूप वाईट वाटलं. काय आहे ना आलोजी माझे सर्वात आवडते कलाकार आहेत. त्यांच्यासोबत काम करताना मला जितकी मजा आली ती याआधी कधीच नव्हती आली. माझा वैयक्तिक अनुभव हाच राहिला आहे की आम्ही युनिटमध्ये चार पाच मुली होतो. त्यांनी आम्हा सर्वांनाच सम्मानाने वागवलं. मी चुकीच्या गोष्टी सहन करणार नाही मग समोर कोणीही असो. ते सम्मान करायचे."

ती पुढे म्हणाली, "तुम्ही प्रियंका, प्राची किंवा कोणालाही विचारा...आम्ही आलोकजींच्या घरी पार्टी करायचो. हो ते खूप ड्रिंक करायचे पण म्हणून त्यांनी कधीच गैरवर्तन केलं नाही. बाकी त्यांच्या आयुष्यात काय झालं त्यावर मी कमेंट करणं योग्य नाही. पण आमच्यासोबत ते कसे होते हे मी १०० टक्के सांगू शकते त्यांनी आम्हाला मुलींसारखंच वागवलं. आमच्यासोबत ते खूप चांगले होते."

आलोक नाथ यांचा स्वभाव आता खूप कठोर झालाय

या सर्व प्रकरणानंतर नारायणीने आलोक नाथ यांना फोन केला का? यावर ती म्हणाली, "मी फोन केला होता पण ते कोणाचाच फोन घेत नव्हते. काही दिवसांपूर्वीच माझं त्यांच्याशी बोलणं झालं. बरेच दिवसांनी बोलणं होतंय पाहून त्यांनाही आश्चर्य वाटलं. त्यांच्या मनाला खूप लागलं आहे त्यांचा स्वभाव कठोर झाला आहे. कोणाचं काय होतं काय नाही मला माहित नाही पण माझ्यासाठी ते खूप चांगले होते आणि आहेत. माझ्यासाठी ते आजही माझे सर्वात चांगले सहकलाकार आहेत."

नारायणीने आलोक नाथ यांच्यासोबत 'पिया का घर' मालिकेत काम केलं होतं. यामध्ये ती त्यांच्या मुलीच्या भूमिकेत होती. २०१८ साली मीटू वेळी लेखिका विंता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. याशिवाय संध्या मृदुल आणि दीपिका आमीन यांनीही त्यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला होता. यानंतर आलोक नाथ अभिनयापासून दूर झाले.

टॅग्स :नारायणी शास्त्रीआलोकनाथटिव्ही कलाकारमीटूमराठी अभिनेता