Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. आता सरकार या अर्थसंकल्पात काय सादर करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शेतकऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर या अर्थसंकल्पात सरकार शेतकऱ्यांचा विचार करू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या अर्थसंकल्पातही सरकारनं शेतीला ९ प्राधान्यक्रमात अग्रस्थानी ठेवलं होतं. त्याचबरोबर शेतकरी आंदोलनामुळे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा होऊ शकतात, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आलीये.
किसान सन्मान निधीचा हप्ता वाढणार?
या अर्थसंकल्पात सरकार किसान सन्मान निधीच्या हप्त्यात वाढ करू शकते. आतापर्यंत किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळत होते. आता ही रक्कम ८००० रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. संसदेच्या कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया विषयक स्थायी समितीने १७ डिसेंबर रोजी लोकसभेत सादर केलेल्या अहवालात ती वाढवून १२ हजार रुपये करण्याची शिफारस केली होती.
पिक विमा योजना
अर्थसंकल्प २०२५ मध्ये पीक विमा योजनेची व्याप्ती वाढविली जाऊ शकते. कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नुकतेच या योजनेचा लाभ सांगितला होता. अशा परिस्थितीत सरकार या योजनेत मोठे बदल करू शकते. संसदेच्या स्थायी समितीनेही तशी शिफारस केली होती. दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही युनिव्हर्सल क्रॉप इन्शुरन्स स्कीमची सुविधा मिळावी, असं अहवालात म्हटलं आहे.