Life Insurance Tips : आजच्या अनिश्चिततेच्या काळात विमा उतरवणे ही चैनीची गोष्ट नसून ती एक गरज बनली आहे. आयुष्यात अचानक ओढवणाऱ्या संकटांपासून आपल्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देण्यासाठी जीवन विमा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मात्र, बाजारात अनेक कंपन्यांचे पर्याय उपलब्ध असल्याने, 'कोणती कंपनी निवडावी' असा प्रश्न अनेकांना पडतो. केवळ प्रीमियमची रक्कम कमी आहे म्हणून विमा घेणे धोक्याचे ठरू शकते. विमा कंपनी निवडताना ४ गोष्टी नक्कीच तपासायला हव्यात.
१. कंपनीची आर्थिक ताकद
सॉल्व्हन्सी रेश्यो म्हणजे विमा कंपनीची स्वतःची देणी आणि क्लेम देण्याची आर्थिक क्षमता. हा रेश्यो जितका मजबूत, तितकी कंपनीची आर्थिक स्थिती भक्कम मानली जाते. जर भविष्यात मोठी आपत्ती आली, तर कंपनी आपल्या सर्व ग्राहकांना क्लेम देण्यास समर्थ आहे की नाही, हे यावरून स्पष्ट होते. मजबूत सॉल्व्हन्सी रेश्यो असलेली कंपनी क्लेम सेटलमेंटमध्ये अडथळे आणत नाही.
२. क्लेम सेटलमेंट रेशो
विमा घेण्यामागचा मूळ उद्देश म्हणजे गरजेच्या वेळी पैसे मिळणे. कंपनीकडे वर्षभरात आलेल्या एकूण क्लेमपैकी तिने किती टक्के क्लेम मंजूर केले, हे या रेश्योवरून समजते. समजा एखाद्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेश्यो ९८% असेल, तर याचा अर्थ त्यांनी १०० पैकी ९८ क्लेम यशस्वीपणे निकाली काढले आहेत. विमा घेण्यापूर्वी हा रेश्यो नेहमी ९५% पेक्षा जास्त असावा, हे तपासा.
३. सातत्य प्रमाण
हा रेश्यो अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तो दर्शवतो की कंपनीचे जुने ग्राहक आपली पॉलिसी वेळेवर प्रीमियम भरून सुरू ठेवत आहेत की बंद करत आहेत. जर पर्सिस्टन्सी रेश्यो जास्त असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की ग्राहक कंपनीच्या सेवेवर समाधानी आहेत. जर लोक पॉलिसी अर्धवट सोडत असतील, तर त्या कंपनीची सेवा किंवा अटींमध्ये काहीतरी त्रुटी असू शकते.
वाचा - सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
४. तक्रार निवारण दर
एखाद्या कंपनीविरुद्ध ग्राहकांच्या किती तक्रारी येतात आणि त्यापैकी किती तक्रारींचे कंपनीने वेळेत निराकरण केले, हे यावरून समजते. कमी तक्रारी आणि जलद निराकरण हे उत्तम ग्राहक सेवेचे लक्षण आहे. ज्या कंपनीचा तक्रार निवारण दर चांगला आहे, तिथे क्लेम किंवा अन्य कामांसाठी तुम्हाला कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत.
