उजनी आणि वीर धरणांतून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढल्याने मंगळवारी भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच पंढरपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली जाऊन भीमा नदी दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. विसर्ग वाढल्यामुळे पंढरपूर येथील चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्यात जाणार आहेत. वाढता विसर्ग, आषाढी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे.
काही दिवसांपासून नीरा व भीमा खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे वीर धरणातून नीरा नदीपात्रात ६,५३७ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. त्याचवेळी उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये ३१,६०० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.
नीरा व भीमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे अनियंत्रित विसर्ग नदीपात्रामध्ये येत आहे. त्यामुळे सद्य:स्थितीतील दोन्ही धरणांतून येणारा विसर्ग पाहता भीमा नदीपात्रामध्ये ४० हजार क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग राहील.
किनारपट्टीला इशारा
कोकण किनारपट्टीला सोमवारी सायंकाळी ५:३० पासून २५ जून रात्री ८:३० वाजेपर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील २४ तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट दिला आहे.
हेही वाचा : 'लिंबोणी'ने दिली आयुष्याला कलाटणी; ३० गुंठ्यांमध्ये रानबा खरातांनी साधली आर्थिक प्रगती