Maharashtra Rain : सोमवार दि. ८ सप्टेंबर पासुन महाराष्ट्रात जरी काहीशी उघडीप जाणवू लागली असली तरी संपूर्ण विदर्भातील अकरा व सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली अशा एकूण वीस जिल्ह्यांत मात्र अजूनही पुढील सहा दिवस पाऊस आहे.
म्हणजे आजपासुन ते सोमवार दि. १५ सप्टेंबरपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही कायम आहे. विदर्भातील अकरा जिल्ह्यात मात्र मंगळवार दि. १६ सप्टेंबर नंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवते. उर्वरित महाराष्ट्रातील उघडीपीनंतरचा पाऊस- १२ सप्टेंबर पर्यंतच्या उघडीपीनंतर, उर्वरित महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश मध्य-महाराष्ट्र व मराठवाड्यातील अशा एकूण २५ जिल्ह्यांत शनिवार दि.१३ ते गुरुवार दि. १८ सप्टेंबर दरम्यान पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. कोणत्या वातावरणीय प्रणालीमुळे या पावसाची शक्यता आहे. दक्षिण ओरिसा व उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टी दरम्यान ३.१ किमी. उंचीपर्यंतच्या चक्रीय वारा स्थिती आणि मान्सून आसाचे पश्चिम टोक दक्षिणेकडे पार गुजराथ पर्यन्त सरकल्यामुळे त्याच्या परिणामातून अरबी समुद्र व बंगालच्या उप सागरातून खेचल्या जाणाऱ्या आर्द्रतेतुन मान्सूनी वारे सक्रिय महाराष्ट्रात शनिवार दि. १३ सप्टेंबर पासुन पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
- माणिकराव खुळेMeteorologist (Retd)IMD Pune