सातारा : जिल्ह्यात पाऊस पुन्हा वाढू लागला असून २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक ५१, तर महाबळेश्वरला ४० मिलिमीटरची नोंद झाली.
तसेच कोयनेतील पाणीसाठा १०३ 'टीएमसी'वर गेला आहे. धरण भरण्यासाठी दोन 'टीएमसी'ची पाण्याची गरज असल्याने सध्याची आवक पाहता दरवाजे चौथ्यांदा उघडून विसर्ग करावा लागणार आहे.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १९ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर नवजा येथे ५१ आणि महाबळेश्वरला ४० मिलिमीटर पाऊस पडला आहे.
सकाळच्या सुमारास धरणात १२ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात १०३.०८ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण भरण्यासाठी दोन टीएमसीहून अधिक पाण्याची गरज आहे.
तर धरणाच्या पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. तरीही धरणातील आवक पाहून पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी दरवाजे चौथ्यांदा उघडले जाणार आहेत.
वारणा धरणाचे चारही दरवाजे पुन्हा उघडले◼️ वारणा धरण पाणलोट क्षेत्रात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. धरणाचे चारही दरवाजे शनिवारी सकाळी नऊ वाजता बंद करण्यात आले होते. ते मंगळवारी सायंकाळी ७ वाजता उघडण्यात आले.◼️ त्यामुळे आता दरवाजे व वीजनिर्मिती केंद्रातून ४९९५ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरण ९७.५० टक्के भरले आहे. पाथरपुंज येथे आजअखेर ६८०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अधिक वाचा: शेतरस्ते होणार आता कायमचे अतिक्रमणमुक्त; प्रत्येक रस्त्यासाठी मिळणार विशिष्ट नंबर