Join us

Maharashtra Weather Update : जळगावसह मुंबई गारठली, IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 09:30 IST

राज्यात पुढील काही दिवस तापमानात मोठी घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईत वर्षभरातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे. मुंबईत सोमवारी (९ डिसेंबर) रोजी मागील ९ वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. तर जळगाव जिल्ह्यात राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

जळगावमध्ये ८.९ अंश सेल्सिअस एवढे कमी तापमान नोंदविण्यात आले आहे. तर पुण्यासह नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे देखील कमी तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवस राज्याच्या तापमानात आणखी ४ ते ५ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तर विदर्भात काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. मुंबईत सोमवारी दिवसभर थंड वारे वाहिले. त्यामुळे मुंबईकरांनी गुलाबी थंडीचा आनंद घेतला. सोमवारी मुंबईत पहाटे गेल्या ९ वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ केंद्रात सोमवारी १३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या ९ वर्षातील हे सर्वात कमी तापमान होते. यापूर्वी डिसेंबर २०१५ मध्ये किमान तापमान ११.४ अंश सेल्सियस होते. मुंबईत किमान तापमान १९.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे येत्या २४ तासांत मुंबई, नाशिक, जळगाव व पुण्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

आज (१० डिसेंबर) आग्नेय बंगालच्या उपसागर आणि लगतच्या पूर्व विषुववृत्तीय हिंद महासागरावरील कमी दाबाचे क्षेत्र स्थिर आहे. त्याची वाटचाल वायव्य दिशेला सुरू असून पुढील २४ तासात ते अधिक ठळक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे व परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमान पुढील ४ ते ५ दिवस ८ ते १० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

जळगाव राज्यात सर्वाधिक थंड

राज्यात जळगाव जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. जळगावचे किमान तापमान ८.६ अंशापर्यंत खाली आले होते. कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांनी शेकोट्या आणि गरम कपडे घालण्यास सुरुवात केली आहे. जळगावमध्ये सकाळपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट होता. पुढील काही तासांत जळगावमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.

नाशिकमध्येही थंडीचा जोर वाढला असून नाशिकमध्ये ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुण्यात १२.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांत आज सर्वात कमी ११ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले तर जालना आणि बीड या जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

बदलत्या हवामानानुसार दूध उत्पादनावरील पशुधन आणि अन्य प्राण्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. दुधावरील जनावरांना योग्य प्रमाणात खनिज द्राव्याचे मिश्रण द्यावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वेळी जंतनाशकाची औषधे देण्यात यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानमराठवाडाजळगावमुंबई