जागतिक हवामान जगभरात दिनानिमित्त हवामान बदलाबाबत जनजागृती केली जात असताना, अकोल्यासह विदर्भावर हवामान बदलाचे सावट अधिक गडद होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षात कमाल तापमानात सतत वाढ होत असून, यंदाही उन्हाळ्याची तीव्रता वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
हवामान तज्ज्ञांच्या मते, मागील काळात ला-निनाच्या प्रभावामुळे काही प्रमाणात पावसाचे प्रमाण वाढले होते. मात्र आता हळूहळू एल-निनो सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल-निनोमुळे पावसाचे प्रमाण घटणे, दुष्काळी परिस्थिती निर्माण होणे आणि तापमानात लक्षणीय वाढ होणे, असे परिणाम दिसून येतात.
अकोल्यात मागील काही दिवसांत तापमानाने ४० अंशांच्या पुढे झेप घेतली असून, एप्रिल-मे महिन्यात ते ४५ अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शहरासह ग्रामीण भागात उष्णतेची लाट जाणवू लागली असून, दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळही कमी होत आहे.
दरम्यान, सध्या अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान सध्या ३६ ते ३७ अंश नोंदविण्यात आले आहे, पण ढगाळ वातावरण निवळताच पुन्हा कमाल तापमान वाढणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
शेतकऱ्यांपुढे आव्हान
• तज्ज्ञांच्या मते, हवामान बदलाचा थेट परिणाम शेती, पाणीटंचाई, आरोग्य आणि पर्यावरणावर होत आहे. विशेषतः विदर्भातील पीकपद्धती, जलस्रोत आणि जैवविविधता यावर त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरही नव्या आव्हानांची उभी ठाकली आहे.
• हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण, वृक्षारोपण, ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे ही काळाची गरज बनली आहे. हवामान बदलाचा वेग कमी करण्यासाठी शासनासोबतच नागरिकांनीही जबाबदारीने पावले उचलणे आवश्यक असल्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
मार्चमध्ये तापमान ४२ अंशांवर
यावर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कमाल तापमान ४२ अंशांवर पोहोचले होते, अवकाळी पावसामुळे तापमानात सध्या घट झाली आहे. ढगाळ वातावरण निवळताच कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. याच महिन्यात ८ आणि १४ मार्च, असे दोन दिवस अकोल्याचे कमाल तापमान देशात सर्वाधिक उच्चांकी नोंदविले गेले होते.
हेही वाचा : भारतीय वारसा कायद्यानुसार हाताने लिहिलेले 'मृत्युपत्र' वैध ठरेल का? जाणून घ्या सविस्तर