नाशिक : नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, सिन्नर व चांदवड तालुक्यांतील लघु तलावांमध्ये रब्बी हंगामा अखेर उपयुक्त पाणीसाठा उलब्धतेनुसार उन्हाळा हंगामात पिण्यासाठी, जनावरांना व वापरासाठी आरक्षित केलेले पाणी शिल्लक ठेवून उर्वरित पाणी प्रवाही व उपसा सिंचन पद्धतीने पाणी घेव इच्छिणाऱ्या लाभधारक शेतकरी व संस्था पुरवठा करण्यात येणार आहे.
यासाठी शेतकरी व पाणी वापर संस्थांनी १५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत आपले अर्ज नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात सादर करावे व रितसर पोहोच घ्यावी, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे. वरील लघु प्रकल्पात उपलब्ध असणारे पाणी, ,यातून बिगर सिंचन आरक्षीत पाणी तसेच भविष्यात बिगर सिंचन आरक्षणात वाढ झाल्यास तो पाणीसाठी, बाष्पीभवन व इतर अनिवार्य वापर इत्यादी वजा जाता सिंचनासाठी उपलब्ध पाणी विचारात घेवून नमुना नंबर ७ वर विहिरीच्या पाण्याची जोड असलेल्या सिंचन क्षेत्रास उन्हाळ हंगाम २०२५-२६ मध्ये उन्हाळी हंगामी पिके, चारा पिके व बारमाही उभी पिके, ऊस व फळबाग इत्यादींना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे.
वरील प्रकल्पांत शासन धोरणानुसार धरणातील उपलब्ध असलेले पाणी हे उन्हाळी हंगामा अखेर पुरवावे लागणार असल्याने प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागवून उर्वरीत पाण्यात शेतीच्या पिकासाठी व औद्योगिक कारखान्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. शेतीसाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्यात पाणीपुरवठा करताना आर्वतन कालावधीत कमी जास्त अंतर करून पुरवावे लागते, यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा.
सूक्ष्म सिंचनावर अधिक भर द्यावा. पिकांना काही कारणास्तव कमी- अधिक पाणी मिळून नुकसान झाल्यास याबाबत कोणतीही नुकसान भरपाई शासनाकडून व पाटबंधारे विभागाकडून देण्यात येणार नाही. याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घेवूनच अर्ज दाखल करावेत. याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या सिंचन शाखेशी संपर्क साधावा, असेही कार्यकारी अभियंता श्रीमती शहाणे यांनी कळविले आहे.