Manjara Dam Water Storage : केज तालुक्यातील मांजरा प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने बुधवारी (२७ ऑगस्ट) रोजी दुपारी दोन दरवाजे उघडून १७४७ क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. (Manjara Dam Water Storage)
सध्या धरण ९८ टक्के भरले असून, नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Manjara Dam Water Storage)
केज तालुक्यातील धनेगाव येथे असलेल्या मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातीलपाणीपातळीत वाढ होत आहे. वाढत्या आवकेमुळे पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी बुधवारी (२७ ऑगस्ट) रोजी दुपारी ३.४० वाजता प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. (Manjara Dam Water Storage)
या दरम्यान ०.२५ मीटर उंचीने दोन्ही दरवाजे उघडून नदीपात्रात १७४७.१४ क्यूसेक (४९.४८ क्यूमेक्स) इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे.(Manjara Dam Water Storage)
सध्या मांजरा प्रकल्पात एकूण ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रातील पाऊस कायम असल्याने प्रकल्पात आवक सुरूच आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत धरणातून विसर्ग सुरू राहण्याची शक्यता आहे. धरण प्रशासनाने यासंदर्भात सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीपात्रातील प्रवाहात वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नदीपात्राजवळ जनावरे चाऱ्यासाठी नेऊ नयेत तसेच नागरिकांनी अनावश्यकपणे नदीपात्रात जाणे टाळावे, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील बहुतांश धरणांचा पाणीसाठा समाधानकारक झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी काही प्रकल्पांतून विसर्ग सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मांजरा प्रकल्पातून होत असलेला हा विसर्ग नदीपात्रातील गावांसाठी दिलासा आणि आव्हान दोन्ही ठरणार आहे. एका बाजूला पाण्याची उपलब्धता वाढणार असली तरी दुसऱ्या बाजूला खबरदारी घेणे गरजेचे ठरणार आहे.