Join us

Manjara Dam Water Release : मांजरा धरण पाच वेळा भरेल इतका पाण्याचा विसर्ग; १९९८ चा विक्रम मोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 13:24 IST

Manjara Dam Water Release : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा धरणाचा जलसाठा वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सध्या नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Manjara Dam Water Release : लातूरकरांच्या जीवनवाहिनी असलेल्या मांजरा धरणात यंदा झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे प्रकल्पाच्या इतिहासात विक्रमी १०८४ दलघमी पाणीनदीपात्रात सोडावे लागले आहे. या विसर्गामुळे धरणाची एकूण साठवण क्षमता २२४.०३ दलघमी पाच वेळा भरली असती इतके पाणी बाहेर गेले आहे.

प्रकल्पाच्या नोंदीनुसार, १९९८ मध्ये १०११ दलघमी पाणी विसर्ग करण्यात आले होते; परंतु यंदा त्यापेक्षा ७५ दलघमी अधिक पाणी सोडावे लागले, अशा प्रकारे इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग नोंदवला गेला आहे.

लातूर जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद

लातूर जिल्ह्याची वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७८०.६ मिमी असताना, यंदा प्रत्यक्षात ९५९.९ मिमी पाऊस झाला आहे.

मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातच तब्बल ९०९ मिमी पाऊस नोंदला गेला आहे, जो आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा मानला जातो.

२९ सप्टेंबरनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील चार ते पाच दिवस सुरू राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

वरच्या प्रकल्पांमुळे सततची आवक

मांजरा धरणाच्या वरच्या भागात असलेल्या महासांगवी व संगमेश्वर मध्यम प्रकल्पांमधून पाण्याची सततची आवक सुरू आहे. हे दोन्ही प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे मांजरा प्रकल्पातील पाण्याची पातळी जलदगतीने वाढली आहे.

सद्यस्थितीत धरणाचे दोन दरवाजे (क्रमांक १ आणि ६) प्रत्येकी ०.२५ मीटरने उघडले असून, १७४७ क्युसेक्स (४९.४८ क्युमेक्स) इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

विसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता पूर नियंत्रण कक्ष, धनेगाव यांच्याकडून नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

गावकऱ्यांनी नदीकाठावर जाणे टाळावे आणि पाण्याच्या प्रवाहातील वाढ लक्षात घेऊन सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रकल्पाची क्षमता 'फिकी' पडली

मांजरा प्रकल्पाची साठवण क्षमता २२४ दलघमी असली तरी, यंदा सोडण्यात आलेले पाणी या क्षमतेपेक्षा अनेक पटीने जास्त १०८४ दलघमी इतके आहे. याचा अर्थ, धरण पाच वेळा भरले असते इतका पाऊस यंदा झाला आहे.

इतका मोठा पाण्याचा विसर्ग प्रकल्पाच्या इतिहासात प्रथमच नोंदवला गेला असून, १९९८ चा विक्रम अखेर मोडला आहे.

महत्वाची आकडेवारी

१०८४ दलघमी पाणी विसर्ग — इतिहासातील सर्वाधिक

९०९ मिमी पाऊस — प्रकल्प क्षेत्रातील विक्रमी नोंद

५ वेळा धरण भरेल इतका पाऊस

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

विसर्ग अजूनही सुरूच — १७४७ क्युसेक्स

लातूर जिल्ह्यातील मांजरा प्रकल्प यंदा अभूतपूर्व पावसाने तुडुंब भरला असून, प्रकल्पाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. 

यामुळे जलसंपन्नतेचा आनंद असला, तरी नदीकाठच्या गावांना पूराचा धोका टळलेला नाही, त्यामुळे प्रशासन आणि नागरिक दोघांनाही सतर्क राहण्याची गरज आहे.

हे ही वाचा सविस्तर : Jayakwadi Dam Water Release : धरण ओसंडले! जायकवाडीमधून २८ हजार क्युसेक विसर्ग वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Manjara Dam Overflows: Record Water Release Exceeds 1998 Levels

Web Summary : Unprecedented rain caused record water release from Manjara Dam, exceeding 1998 levels. The release equals five times the dam's capacity. Riverbank villages are alerted as discharge continues from overflowing upstream projects.
टॅग्स :शेती क्षेत्रमांजरा धरणधरणपाणीलातूरनदी