Maharashtra Weather Update : राज्यात हिवाळ्याचा प्रभाव आता ओसरू लागला असून तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. (Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या च्या ताज्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. त्यामुळे थंडीची तीव्रता कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागणार आहे.(Maharashtra Weather Update)
मुंबईत सकाळी धुके, दुपारी उकाडा
१९ फेब्रुवारी रोजी मुंबई आणि उपनगरात सकाळी काही प्रमाणात धुक्याची चादर पाहायला मिळू शकते. दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
कमाल तापमान सुमारे ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सकाळी आणि रात्री हवेत सौम्य गारवा जाणवेल; मात्र दुपारी उकाडा वाढण्याची शक्यता आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कोरडे हवामान
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत पुढील दोन दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे आणि सूर्यप्रकाशित राहील. सुरुवातीला कमाल तापमानात मोठा बदल होणार नसला तरी त्यानंतर तापमानात हळूहळू २ ते ३ अंशांची वाढ होईल. त्यामुळे रात्रीची थंडी कमी होत जाईल आणि दिवसाच्या वेळेत कडक ऊन जाणवेल.
किमान तापमानात वाढ
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानातही वाढ होणार आहे. पुढील पाच दिवसांत रात्रीच्या तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस वाढ होईल. विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सध्या जाणवणारी थंडी कमी होण्याचे संकेत आहेत.
राज्यातील स्थिती
महाराष्ट्रालगतच्या गुजरात राज्यातही हवामान बदलत आहे. पुढील ३ दिवसांत किमान तापमानात वाढ होईल. कमाल तापमान दोन दिवसांनी वाढून त्यानंतर पुन्हा चार दिवसांनी २ ते ३ अंशांनी घसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागरिकांना आवाहन
हवामानातील या बदलामुळे सकाळ-संध्याकाळ गारवा आणि दुपारी उकाडा अशी स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
१९ फेब्रुवारीपासून राज्यात थंडीचा प्रभाव कमी होऊन उष्णतेची सुरुवात होणार असल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा चढत जाणार असून हिवाळा हळूहळू निरोप घेणार आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* टोमॅटो, वांगी, मिरची, कांदा यांना उष्णतेचा ताण येऊ शकतो.
* मल्चिंग (प्लास्टिक आच्छादन) वापरल्यास जमिनीतील ओल टिकून राहते.
* फुलधारणेच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये.
