Maharashtra Weather Update : आज पासून पुढील चार दिवस म्हणजे मंगळवार दि.२४ डिसेंबरपर्यंत मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात (Weather Update) पहाटे पाचचे किमान तापमान भागपरत्वे सध्या सरासरीपेक्षा १ ते ४ डिग्री से. ग्रेडने अधिक असल्यामुळे तेथे माफक थंडी जाणवत आहे.
पण मुंबईसह कोकणात (Mumbai Weather) मात्र हेच तापमान सरासरीपेक्षा १ ते २ डिग्री से. ग्रेडने खालावले असल्यामुळे मुंबईसह कोकणात, उर्वरित महाराष्ट्राच्या मानाने तेथे अधिक थंडी जाणवते आहे, असे मत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे.
नाताळ सणादरम्यानचा पाऊस?
पश्चिमी प्रकोपाच्या प्रेरित परिणामातून, नाताळ सणात म्हणजे २५ ते २९ डिसेंबर (बुधवार ते रविवार) पाच दिवसा दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात, भाग बदलत, ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यताही जाणवते. त्यातही गुरुवार दि. २६ ते शनिवार दि.२८ डिसेंबर पर्यंतच्या तीन दिवसात पावसाची ही शक्यता अधिक जाणवते.
गहू, हरभरा सारख्या (Wheat Crops) पिकांना या पावसाने लाभ होवु शकतो, असे वाटते. त्यामुळे ह्या पाच दिवसातील वातावरणातून, दरवर्षी नाताळ सणाला जाणवणारी तीव्र थंडी ह्यावर्षी ढगाळ वातावरणामुळे अनुभवता येणार नाही, असे वाटते. मात्र वर्षाअखेरीस म्हणजे सोमवार दि.३० डिसेंबरपासून हळूहळू थंडीत वाढ होवुन नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीची अपेक्षा करू या!
सध्या सकाळी जाणवणारे धुके कशामुळे?
सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीसमोर, दक्षिणोत्तर उभ्या लंबवर्तुळाकार समुद्री क्षेत्रात, समुद्रसपाटीपासून दिड किमी. उंचीपर्यंत, अरबी समुद्रात, असलेल्या आवर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीतून, दक्षिणी (दक्षिणेकडून उत्तरेकडे) वाहणाऱ्या वाऱ्यामुळे संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व छ.सं.नगर, जालना अशा एकूण १९ जिल्ह्यात अरबी समुद्रावरून प्रचंड आर्द्रता लोटली जात आहे. त्यामुळे या १९ जिल्ह्यात पुढील चार दिवस म्हणजे मंगळवार दि.२४ डिसेंबरपर्यंत सकाळच्या वेळेस धुके पडण्याची शक्यता जाणवते.
विदर्भातील माफक थंडी कायम -
विदर्भासहित उर्वरित १७ जिल्ह्यात मात्र उत्तरी (उत्तरेकडून दक्षिणेकडे) वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यातून तेथे मात्र माफक थंडी जाणवणारच आहे, असे वाटते.
धुक्याचा रब्बी पिकावर होणारा परिणाम?
कांदा, गहू, हरभरा पिकावर अळी, किडी, बुरशी, माव्याचे आक्रमण होते. किड व बुरशीनाशकाच्या फवारण्या घ्याव्या लागतात. फुलोऱ्यातील पिकात परागीभवन व दाणाभरणीवर विपरित परिणाम होतो. प्रकाशसंस्लेषण अभावी कमी अन्नद्रव्ये पुरवठ्यामुळे पिके कोमेजतात. त्यांच्या वाढीवर, शाखीय डाफळणीवर विपरित परिणाम होतो.
द्राक्षांच्या घड तयार होत असतांना दमट हवामानाचा विपरीत परिणाम जाणवतो. त्यामुळे या चार दिवसात शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे वाटते. दरम्यानच्या कालावधीत, ह्या व्यतिरिक्त एकाकी वातावरणात काही बदल जाणवल्यास तसे अवगत केले जाईल.
- माणिकराव खुळे.
Meteorologist (Retd)
IMD Pune