Katepurna Dam : महान परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने काटेपूर्णा धरणाच्यापाणीसाठ्यात वाढ थांबली असून, साठा सुमारे ५०.७९ टक्क्यांवर स्थिरावला आहे. (Katepurna Dam)
शेतीकामांना काहीशी गती मिळाली असली, तरीही धरणसाठा वाढवण्यासाठी मालेगाव व परिसरात दमदार पावसाची गरज असल्याचे चित्र आहे. २ ऑगस्ट रोजी धरण साठा ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला होता, मात्र त्यानंतर ३ ते ५ ऑगस्टदरम्यान साठा केवळ ५०.७९% वरच स्थिर आहे. (Katepurna Dam)
मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी काटेपूर्णा धरणाची पातळी ३४४.३९ मीटर नोंदवली गेली असून, त्यामध्ये ४३.८६३ दलघमी (दशलक्ष घनमीटर) इतका जलसाठा आहे.(Katepurna Dam)
पाणीसाठा वाढत नाही, कारण...
सध्या काटाकोंडाळा नदीमार्गे जितके पाणी धरणात येत आहे, तितकेच पाणी अकोला शहरासाठी जलशुद्धीकरण केंद्रातून पुरवले जात आहे. परिणामी, साठ्यात प्रत्यक्ष वाढ होत नसल्याचे स्पष्ट होते. पाणीपुरवठा सुरळीत सुरू असला, तरी आगामी काळात साठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टीची नितांत गरज आहे.
२२१ मिमी पावसाची नोंद
धरण क्षेत्रात आजअखेर २२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. काटेपूर्णा धरणात डव्हा, जऊळका रेल्वे, अमनवाडी, मुसळवाडी, धानोरा व फेट्रा परिसरातून वाहणारे पाणी काटाकोळा नदीमार्गे मिसळते. मात्र या भागातही सध्या पावसाचा जोर कमी असल्याने साठ्यात वाढ होत नाही.
शेतकऱ्यांना थोडसा दिलासा
उघड्या हवामानामुळे डवरणी, निंदणी व कीटकनाशक फवारणी यासारख्या शेती कामांना गती मिळाली आहे. मात्र खरीप पिकांना पुरेसा आधार मिळावा, यासाठी लवकरात लवकर मुसळधार पावसाची गरज असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.