Jayakwadi Dam water Release : पैठण येथील जायकवाडी धरणातून वरच्या पाणलोटातून वाढत्या आवकनुसार १,०३,७५२ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. (Jayakwadi Dam water Release)
या वाढीव विसर्गामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून, शहागड येथील कोल्हापुरी बंधारा गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. (Jayakwadi Dam water Release)
सततच्या पावसामुळे वाढले संकट
गेल्या काही दिवसांपासून परिसरात संततधार पाऊस होत आहे. नाशिकसह वरच्या भागातील पावसामुळे जायकवाडीच्या नाथसागरातील पाणीपातळी झपाट्याने वाढली. त्यानुसार मंगळवारी सकाळपासून धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. रात्री उशिरा विसर्ग आणखी वाढल्यास २००६ मधील पुरस्थितीची पुनरावृत्ती होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे.
२००६ च्या पुराची आठवण ताजी
सन २००६ मध्ये जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने अनेक गावे पाण्याखाली गेली होती. त्या वेळी अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता. शहागडसह परिसरातील ग्रामस्थांना शाळा, महाविद्यालये व कॅम्पमध्ये सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.
धोक्याची पातळी ओलांडण्याची भीती
सध्या जायकवाडीमधून सोडण्यात आलेले पाणी शहागडच्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दहा फूट वरून वाहत आहे. विसर्गाचा आणखी वेग वाढल्यास नदीपात्र धोक्याची पातळी ओलांडू शकते, अशी भीती स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे.
सुरक्षिततेसाठी सूचना
दरम्यान, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्यास धोक्याच्या क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची तयारी ठेवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून, प्रशासनाकडून तातडीने योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.