दादासाहेब गलांडे
नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीवरील पैठण ते नांदेडपर्यंतचे १४ बंधारे तुडुंब भरले आहेत. यात तब्बल ३०५ दलघमी पाणीसाठा झाला असून भूजल पातळी वाढली आहे.(Jayakwadi Dam Water Discharge)
रब्बी हंगामातील ऊस, गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांना थेट फायदा होणार आहे.(Jayakwadi Dam Water Discharge)
नाशिक जिल्ह्यातील दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. परिणामी नाथसागरातील पातळी वाढून १८ दरवाजांतून गोदापात्रात पाणी सोडण्यात आले.(Jayakwadi Dam Water Discharge)
या विसर्गामुळे पैठण ते नांदेडदरम्यान गोदावरी नदीवरील सर्व बंधारे तुडुंब भरले असून त्यामध्ये तब्बल ३०५ दलघमी पाणी साठले आहे. यामुळे परिसरातील शेतकरी समाधानी असून रब्बी हंगामासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.(Jayakwadi Dam Water)
पैठण ते नांदेडदरम्यान १४ बंधाऱ्यांचा लाभ
गोदावरी नदीवर पैठणपासून नांदेडपर्यंत एकूण १४ बंधारे बांधण्यात आलेले आहेत. हे सर्व बंधारे नाथसागरातून झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यात आपेगाव, हिरडपुरी, शहागड, पाथरवाला, मंगरूळ, लोणीसावंगी, जोगलादेवी, राजा टाकळी, खडका, ढालेगाव, मुदगल, मुळी, दिग्रस आणि विष्णुपुरी या बंधाऱ्यांचा समावेश आहे.
बंधाऱ्यांमधील पाणीसाठा (दलघमीमध्ये)
आपेगाव – ७
हिरडपुरी – ९.६७८
पाथरवाला – ६.७७
मंगरूळ – २५
लोणीसावंगी – ३०
जोगलादेवी – १०
राजा टाकळी – २५
खडका – ५.८७
ढालेगाव – १४.८७
मुदगल – ११.८७
मुळी – ११.३५
दिग्रस – ६३.८५
विष्णुपुरी – ८३.५५
एकूण साठा : ३०५ दलघमी
सिंचन आणि पिण्याच्या पाण्यास दिलासा
गोदावरी नदीवरील सर्व बंधारे भरल्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी विहिरींना पाणी लागले असून उन्हाळ्यातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
रब्बी हंगामात मोठा फायदा
गोदा पट्टयात घेतल्या जाणाऱ्या ऊस, गहू, हरभरा आणि भाजीपाला यांसारख्या पिकांना थेट फायदा होणार असून शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
जायकवाडीतून सोडलेल्या पाण्यामुळे पैठण ते नांदेडदरम्यानचे सर्व बंधारे भरले आहेत. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची समस्या मिटेल.- प्रशांत संत, कार्यकारी अभियंता, गोदावरी महामंडळ
आपेगाव बंधारा भरल्यामुळे विहिरींना पाणी लागले आहे. यामुळे उन्हाळ्यातही पिकांना पाणी मिळेल. शेतकरी वर्ग निश्चिंत झाला आहे.-किशोर दसपुते, शेतकरी