Jayakwadi Dam : जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भागात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणात जोरदार पाण्याची आवक होत आहे. (Jayakwadi Dam)
शनिवारी (५ जुलै) रोजी जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा ४९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. उर्वरित दोन दिवसांत जलसाठा ५० टक्के पार करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Jayakwadi Dam)
नाशिक व अहिल्यानगरात संततधार
जायकवाडीच्या उर्ध्व भागात नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडत आहे. या भागातील १० प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून हे पाणी नांदूर मधमेश्वर प्रकल्पात जमा होत आहे. नंतर गोदावरी नदीमार्गे ते जायकवाडीत पोहोचत आहे.
शनिवारी नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून तब्बल १९ हजार ७१७ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सध्या दररोज सरासरी १५ हजार ३८० क्युसेक वेगाने पाणी जायकवाडीकडे येत आहे.
धरणांमधून पाण्याचा विसर्ग (क्युसेक)
धरणाचे नाव | विसर्ग |
---|---|
गंगापूर | ६,६४२ |
होळकर बंधारा | ४,६५६ |
पालखेड | ७,५१५ |
पुणेगाव | ३,४२० |
भोजपूर | १०० |
भावली | ३८ |
भाम | ७०१ |
वाकी | ३,०७६ |
दारणा | ६५ |
वालदेवी | - |
गोदावरी पात्रात वाढलेली पाणीपातळी
गंगापूर धरणातून दिवसभर ३ हजार ७१६ क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. मात्र, पावसामुळे नदीची पाणीपातळी सातत्याने वाढली. रात्री ८ वाजता विसर्गात वाढ करून ते ९४० क्युसेकने अधिक करण्यात आले. यामुळे होळकर पुलाखालून गोदावरी पात्रात रात्री साडेनऊपर्यंत ७ हजार ५१५ क्युसेक पाणी वाहत होते.
संध्याकाळी ७ वाजता रामकुंडातून ४ हजार ८८१ क्युसेक पाणी पुढे प्रवाहित होत होते. यामुळे दुतोंड्या मारुतीची मूर्ती निम्म्याहून अधिक पाण्यात बुडाल्याने पूरसदृश स्थिती निर्माण झाली.
प्रशासन सतर्क
पाण्याचा वेग व पातळी वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी यशवंतराव महाराज पटांगणात पाण्यात अडकलेल्या युवक अभी सांडगे याला अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने बाहेर काढण्यात यश मिळाले.
२ दिवसांत ५०% पार करण्याची शक्यता
जायकवाडीकडे पाण्याची आवक सातत्याने सुरू असून येत्या दोन दिवसांत प्रकल्पाचा जलसाठा ५० टक्के पार करण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा सविस्तर : Jayakwadi Dam : पावसाने दिला दिलासा! जायकवाडी धरणात जलसाठा वाढतोय वाचा सविस्तर