Nashik Dam Storage : यंदा राज्यातील बहुतांश धरणांमध्ये (Nashik Dam Storage) समाधानकारक जलसाठा आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणामध्ये जेमतेम पाणीसाठा जमा झाला आहे. कारण मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस.
त्यांनतर गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मान्सूनच्या पावसामुळे (Monsoon rain) धरणामध्ये चांगला पाणीसाठा जमा झाला आहे. आजमितीस जिल्ह्यातील धरणामध्ये किती पाणीसाठा आहे, हे पाहुयात....
नाशिक जिल्ह्यातील एकूण 24 प्रकल्प मिळून आजच्या घडीला 25.12 टक्के जलसाठा झाला आहे. मागील वर्षी केवळ 8.1 टक्के इतका जलसाठा होता. यावर्षी जवळपास 18 टक्के अधिक जलसाठा असल्याचे चित्र आहे.
सद्यस्थितीत गंगापूर धरणात 44.42 टक्के इतका जलसाठा असून गंगापूर धरण (Gangapur Dam) समूहात जवळपास 32.50 टक्के इतका जलसाठा आहे. तर मागील वर्षी गंगापूर धरणात 18.37 टक्के इतके पाणी होते. त्या मानाने यंदा गंगापूर धरणात समाधानकारक जलसाठा असल्याचे चित्र आहे.
इतर धरणांची स्थिती पाहिली असता कशापी धरणात 29.5 टक्के, गौतमी गोदावरी धरणात 9.5 टक्के, आळंदी धरणात 11.76% इतका जलसाठा आहे तर पालखेड धरण समूहातील पालखेड धरणात 46.55 टक्के, ओझरखेड धरणात 23.15 टक्के, तर तिसगाव धरणात 2.20 टक्के जलसाठा आहे.
तसेच दारणा धरणात 36.66 टक्के, वालदेवी धरणात 19.33 टक्के तर नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात जवळपास शंभर टक्के जलसाठा आहे. या बंधाऱ्यातून विसर्ग देखील करण्यात येत आहे. तसेच गिरणा खोऱ्याची स्थिती पाहिली असता चणकापूर धरणात 25.63 टक्के, हरणबारी धरणात 26.93 टक्के, केळझर धरणात 30.24 टक्के तर गिरणा धरणात 21.44 टक्के जलसाठा आहे तर माणिकपुंज धरण अद्यापही शून्यावर आहे.