सातारा : जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर कायम राहिला. नवजा, कोयनानगर व महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणात २५ हजार ९२२ क्युसेक आवक झाली.
बुधवारी सायंकाळपर्यंत ४३.०९ टीएमसी साठा झाला. गतवर्षी २५ जूनला कोयनेत ११.४१ टीएमसी पाणी होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जवळपास चौपट पाणीसाठा झाला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू आहे. महाबळेश्वर येथे ५४ मिली आणि कोयना परिसरात २२ मिली पाऊस झाला. तसेच, नवजा येथे तुलनेत कमी १३ मिली पावसाची नोंद झाली.
कोयना धरणात २५ हजार ९२२ क्यूसेक पाण्याची आवक सुरू असून, वीजनिर्मितीसाठी १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
नीराकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा◼️ वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने मंगळवारी (दि. २४) रात्री ११ वाजता सांडव्याद्वारे २९ हजार ११३ क्यूसेक विसर्ग व विद्युतगृहाद्वारे १४०० क्युसेक असा विसर्ग असा तब्बल ३० हजार ५१५ क्यूसेक विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू केला.◼️ यानंतर सायंकाळी हा विसर्ग १९ हजार ७७५ क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. प्रशासनाने जिल्ह्यातील नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अधिक वाचा: उजनी धरण भरण्यासाठी किती पाण्याची आवश्यकता; आजमितीला धरणात किती पाणीसाठा?