Join us

राज्याच्या 'या' विभागाला सलग पावसाचा मोठा इशारा; वाचा काय सांगताहेत हवामान तज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 21:44 IST

Maharashtra Weather Update : संपूर्ण महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचे चित्र विभागनिहाय वेगवेगळे राहणार आहे. ज्यात काही विभागनिहाय कुठे जोरदार पावसाची शक्यता आहे तर कुठे केवळ ढगाळ वातावरणच जाणवणार असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचे चित्र विभागनिहाय वेगवेगळे राहणार आहे. ज्यात काही विभागनिहाय कुठे जोरदार पावसाची शक्यता आहे तर कुठे केवळ ढगाळ वातावरणच जाणवणार असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.

खुळे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार जाणून घेऊया राज्याच्या कोणत्या विभागाला पावसाचा काय इशारा देण्यात आला आहे याची सविस्तर माहिती.  

मध्य महाराष्ट्रात ‘पहाळे टाईप’ पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत आज आणि उद्या (१९ व २० जून) मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यालाच ‘पहाळे टाईप’ पाऊस म्हणतात, म्हणजेच वातावरणात आर्द्रता असूनही पाऊस फार काळ टिकत नाही.

तर खान्देशात हे वातावरण थोडे अधिक काळ टिकण्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु शनिवार २१ जूनपासून २८ जूनपर्यंत फक्त किरकोळ पावसाची शक्यता असून मुख्यत्वे ढगाळ हवामान राहील.

कोकणात सलग १० दिवस पावसाची शक्यता

मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यातील सातही जिल्हे तसेच सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पुढील १० दिवस (२८ जूनपर्यंत) जोरदार पावसाचा मारा होणार आहे. यामुळे पर्जन्यमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असून नद्यांना पूर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पर्यटनस्थळी जाणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा जोर

विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये आजपासून शनिवार २१ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागात शेतकऱ्यांनी पेरण्या सुरुवात केल्यास योग्य होईल असेही सुचवण्यात आले आहे. मात्र त्यानंतरच्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होऊन केवळ तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवणार आहे.

मराठवाड्यात ढगाळ वातावरण पण पावसाची मोठी शक्यता नाही!

मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये पुढील १० दिवस फक्त ढगाळ वातावरण राहणार असून अत्यल्प ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी अजून थोडी वाट पाहावी असा इशारा हवामानतज्ज्ञांनी दिला आहे.

वातावरणात बदल झाल्यास पुन्हा सूचित केले जाईल

हवामानात कोणताही लक्षणीय बदल झाल्यास याची माहिती तातडीने देण्यात येईल असे माणिकराव खुळे यांनी सांगितले. दरम्यान नागरिकांनी हवामान खात्याच्या अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे आणि अफवांपासून दूर राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

हेही वाचा : सुगंधी वनस्पती 'गवती चहा'ची लागवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीहवामान अंदाजपाऊसमोसमी पावसाचा अंदाजवादळ