नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यांतील धरणांतून विसर्ग (Gangapur Dam) वाढविण्यात आला आहे. जिल्ह्यात सरासरीच्या १२२ टक्के पावसाची नोंद झाली असून विसर्गामुळे 'जायकवाडी'ला (Jayakwadi Dam) आतापर्यंत सुमारे १४ टीएमसी पाणी वाहून गेले आहे.
गेल्या महिनाभरापासून पावसाची संततधार सुरूच असून १५ तालुक्यांमध्ये १७४.४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असताना २२०.४ मिमी पाऊस झाला आहे. दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला असून देवळा, मालेगाव, नांदगाव आणि इगतपुरी या चार तालुक्यांमध्ये पाऊस सरासरीही गाठू शकलेला नाही.
जूनपासून पावसाचा हंगाम सुरू होतो. तो ३० सप्टेंबरपर्यंत कायम असतो. १ जूनपासून ३ जुलैपर्यंत या कालावधीत जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये १२२.२ मिमी पाऊस पडला आहे. दिंडोरीत २०५.१ मिमी पाऊस झाला आहे. पावसाचा तालुका अशी ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये ७६९.३ मिमी पाऊस नोंदविला गेला.
अपेक्षेपेक्षा चांगला पाऊस झाल्यानेच धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला. निफाडमध्ये १७८.५ टक्के, पेठमध्ये १७०.७, नाशिक तालुक्यात १६७.३, चांदवडमध्ये १४१.१ टक्के पाऊस झाला आहे. याशिवाय बागलाण, कळवण, सुरगाणा, सिन्नर, येवला या तालुक्यांमध्ये देखील सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे.
धरणांतून विसर्ग गंगापूर धरणातून आतापर्यंत ३० हजार ८५३ क्युसेक वेगाने ३७१६ क्युसेक पाणी सोडण्यात आले. तर दारणा धरणातून ४७६८७ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. याशिवाय गोदावरी उजवा कालवा १८९४ क्युसेक वेगाने १६४ दलघफू, तर गोदावरी डाव्या कालव्यातून १२६० क्युसेक वेगाने १०९ दलघफू पाणी सोडण्यात आले आहे.
सर्वांत कमी पाऊस मालेगावातजिल्ह्यात एकूण सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असली तरी चार तालुक्यांमध्ये सरासरीइतकाही पाऊस होऊ शकलेला नाही. मालेगावात १०६.१ मिमी पाऊस होणे अपेक्षित होते; परंतु ९१.८ मिमीच पाऊस झाला. इगतपुरीत सर्वाधिक ४९५.७ मिमी पाऊस अपेक्षित असताना ४५१.८ मिमी पाऊस झाला आहे. नांदगावात ९२.२, तर देवळ्यात ९५.९ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे.
राज्यातील 'ही' तीन धरण 100 टक्के भरली, वाचा जिल्हा निहाय धरण पाणीसाठा