गजानन मोहोड
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिवणगाव येथील अर्चना जगदीश डोळस यांनी कष्ट, चिकाटी आणि योग्य नियोजनाच्या जोरावर शेतीसोबत पूरक व्यवसाय उभा करत स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Women Farmer Success Story)
पारंपरिक शेती करत असतानाच कृषिपूरक उद्योग उभारून त्यांनी आर्थिक स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या संघर्षमय प्रवासातून अनेक महिलांना प्रेरणा मिळत आहे.(Women Farmer Success Story)
१२ एकर शेतीतून घेतले भरघोस उत्पादन
अर्चना डोळस यांच्या कुटुंबाकडे सुमारे १२ एकर शेती आहे. या शेतीत त्या कुटुंबाच्या सहकार्याने कपाशी, सोयाबीन, गहू आणि हरभरा ही प्रमुख पिके घेतात.
वेळेवर मशागत, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर आणि नियोजनबद्ध शेती यामुळे त्यांच्या शेतात दर्जेदार आणि भरघोस उत्पादन मिळते. शेतीतील मेहनत आणि नियोजनामुळे त्यांनी उत्पादनात सातत्य राखले आहे.
शेतीसोबत पूरक व्यवसायाचा घेतला निर्णय
शेतीवर पूर्णपणे अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते, कारण नैसर्गिक आपत्ती, हवामानातील बदल आणि बाजारभावातील चढ-उतार याचा परिणाम उत्पन्नावर होतो.
हे लक्षात घेऊन अर्चना डोळस यांनी शेतीसोबत पूरक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतःच्या शेतातील तसेच परिसरातील कृषी उत्पादनावर प्रक्रिया करून मसाला उद्योग सुरू केला.
'घरगुती मसाले' व्यवसायातून मिळवली ओळख
अर्चना डोळस या मुख्यतः धने पावडर आणि शुद्ध हळदीची पावडर तयार करतात. स्वतःच्या शेतातील धन्यापासून धने पावडर तयार केली जाते, तर हळद खरेदी करून तिची पावडर बनवली जाते. त्यानंतर त्या मसाल्याचे आकर्षक पॅकेजिंग करून बाजारात विक्री करतात. त्यांच्या उत्पादनात कोणतीही भेसळ नसल्यामुळे ग्राहकांकडून या मसाल्यांना चांगली मागणी मिळत आहे. गुणवत्तेमुळे त्यांचा व्यवसाय हळूहळू वाढत आहे.
केवळ एक हजार रुपयांत उद्योगाची सुरुवात
अर्चना डोळस यांनी मसाला उद्योगाची सुरुवात अत्यंत कमी भांडवलात केली. सुरुवातीला त्यांनी फक्त १ हजार रुपयांत हा व्यवसाय सुरू केला.
घरच्या शेतातील धन्याची पावडर बनवून विक्री सुरू केली. त्यानंतर परिसरातील एका महिलेकडून हळद घेऊन तिची पावडर तयार करून विक्री केली. हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद मिळत गेल्याने हा व्यवसाय वाढत गेला.
विविध लघुउद्योगातून वाढवले उत्पन्न
मसाला उद्योगासोबतच अर्चना डोळस विविध लघुउद्योगही चालवतात. त्या स्वतः कापसाच्या वाती आणि फुलवाती तयार करून विकतात.
याशिवाय घरच्या परसबागेत भाजीपाला लागवड करून घरगुती गरजा पूर्ण करतानाच अतिरिक्त उत्पन्नही मिळवतात. त्याचबरोबर त्या घरचे किराणा दुकानही सांभाळतात.
महिला बचत गटातून नेतृत्व
अर्चना डोळस या स्वामी विवेकानंद महिला बचत गटाच्या अध्यक्ष आहेत. तसेच गावातील गरुडझेप ग्रामसंघाच्या अध्यक्ष म्हणूनही त्या कार्यरत आहेत.
बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व पटवून दिले. स्वयंरोजगाराचे मार्ग दाखवत त्यांनी अनेक महिलांना छोटे उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरित केले आहे.
इतर महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण
अर्चना डोळस यांची यशोगाथा ही ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मर्यादित साधनसामग्री, कमी भांडवल आणि कठीण परिस्थितीतही त्यांनी हार न मानता कष्ट आणि जिद्दीच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
शेतीसोबत पूरक व्यवसाय उभा करून त्यांनी आर्थिक स्थैर्याचा मार्ग शोधला आणि इतर महिलांनाही स्वावलंबनाचा संदेश दिला.
आज अर्चना डोळस यांचा संघर्ष आणि यशाचा प्रवास हा ग्रामीण महिलांसाठी आशेचा किरण ठरत असून, कष्ट, जिद्द आणि योग्य नियोजन असेल तर यश नक्की मिळते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे.
