- विनायक येसेकर
चंद्रपूर : येथील प्रगतीशील शेतकरी कृषी संशोधक दत्तात्रय गणपतराव गुंडावार यांनी आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगातून शेतीक्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे.
धान, सोयाबीन व कपाशीवर पारंपरिक अवलंबित्व न ठेवता त्यांनी चालू हंगामात चार एकर क्षेत्रात मक्याची लागवड करून सेंद्रिय पद्धतीचा यशस्वी प्रयोग साकारला आहे. त्यांनी सध्या केलेल्या एक प्रयोग म्हणजे, साधारणतः एका कणसाच्या धांड्याला एकच कणीस लागतात. मात्र त्यांनी विविध प्रयोग करून एका कणसाच्या धांड्याला पाच-सहा कणसांची किमया साधली आहे.
अशी साधली किमया
गुंडावार यांनी या पिकावर कोणतीही रासायनिक फवारणी न करता स्वतः विकसित केलेल्या प्रमाणानुसार गूळ, हळद, हिंग व दूध यांचे संयुक्त मिश्रण तयार करून चार वेळा फवारणी केली. पिकाला पांढऱ्या माशीची वाढ दिसताच दर २१ दिवसांनी ह्युमिक अॅसिडची फवारणी करण्यात आली. पीक पाच फूट उंचीवर आल्यानंतर फवारणी थांबविण्यात आली. या सेंद्रिय प्रक्रियेमुळे पिकाची वाढ जोमदार झाली असून, सध्या कणसांना दाणे भरू लागले आहेत.
कमी खर्चात जास्त उत्पादन
साधारणपणे मक्याच्या एका धांड्यावर एक किंवा दोन कणसे लागतात, मात्र गुंडावार यांच्या विशेष संशोधनामुळे एका धांड्यावर पाच ते सहा कणसे लागली आहे. ही बाब परिसरातील शेतकऱ्यांसाठी आश्चर्याचा विषय ठरली आहे. चार एकर क्षेत्रात सुमारे सहा हजार रुपयांच्या खर्चात त्यांनी उल्लेखनीय उत्पादन साध्य केले आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन हे या प्रयोगाचे वैशिष्ट्य ठरत आहे.
पुरस्कारांनी सन्मानित संशोधन प्रवास
दत्तात्रय गुंडावार यांनी विविध पिकांवर संशोधन करून राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक अनेक पुरस्कार मिळाले आहे. महाराष्ट्र शासन वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार (२०१४), महाराष्ट्र राज्यस्तरीय कृषी रत्न पुरस्कार (२०१७), महाराष्ट्र शासन वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (२००८), कृषिरत्न पंजाबराव देशमुख स्मृती कृषी पुरस्कार, दूरदर्शन सह्याद्री वाहिनी कृषी सन्मान पुरस्कार (२०१८), भारतीय कृषक समाजकडून कृषी पुरस्कार यासह अनेक राज्यस्तरीय व स्थानिक सन्मानांचा समावेश आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नवी दिशा
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांवरच अवलंबून न राहता कमी खर्चातील आणि जास्त उत्पन्न देणाऱ्या पर्यायी पिकांकडे वळावे, असे आवाहन गुंडावार यांनी केले आहे. योग्य नियोजन, सेंद्रिय उपाययोजना आणि प्रयोगशील वृत्ती असल्यास शेती अधिक फायदेशीर होऊ शकते.
दत्तात्रय गणपतराव गुंडावार यांचे संशोधन हे केवळ एका शेतकऱ्याचे यश नसून, संपूर्ण कृषी क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे. कमी खर्च, सेंद्रिय पद्धत आणि उच्च उत्पादन या त्रिसूत्रीच्या आधारे त्यांनी शेतीला नवी दिशा दिली आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे भविष्यात मक्याचे उत्पादन वाढविण्यासाठी नवे मार्ग खुले होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
