संतोष स्वामी
दुष्काळाच्या छायेत शेती म्हणजे जुगार, अशी सर्वसाधारण धारणा असताना जैतापूर येथील घोगरे कुटुंबीयांनी प्रयोगशीलतेच्या बळावर यशाची नवी कहाणी लिहिली आहे. (Farmer Success Story)
केवळ एक एकर हिरवी मिरची आणि अर्धा एकर आल्याच्या पिकातून त्यांनी चार महिन्यांत तब्बल १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.(Farmer Success Story)
योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेचा अचूक अभ्यास यामुळे हे यश शक्य झाले.(Farmer Success Story)
कुटुंबाची पार्श्वभूमी
जैतापूर येथील रघुनाथ राघू घोगरे यांच्याकडे गट क्रमांक ६९ मध्ये सुमारे ७ एकर शेती आहे.
वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मुलगे कैलास आणि सुभाष घोगरे गेली वीस वर्षे शेती सांभाळत आहेत.
पारंपरिक पिकांऐवजी काहीतरी वेगळे करून पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी मिरची आणि आल्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
एक एकर मिरची… साडेतेरा लाखांचे उत्पन्न
मागील वर्षी श्रावण महिन्यात ३ हजार २०० मिरचीची रोपे एक एकर क्षेत्रात लावण्यात आली.
मल्चिंग आणि ठिबक सिंचन पद्धतीचा वापर
रोपे, मजुरी आणि साहित्य मिळून अंदाजे १ लाख रुपये खर्च
नवरात्रीपासून आतापर्यंत ९ तोडण्या
चांगल्या दर्जाच्या उत्पादनाला बाजारात उत्तम दर मिळाल्याने या एकाच एकरातून सुमारे १३.५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
अर्धा एकर आलं… ३ लाखांची भर
गेल्या दोन वर्षांपासून अर्ध्या एकरात आल्याची लागवड केली जाते. या वर्षी आल्यालाही समाधानकारक दर मिळाल्याने 3 लाखांचे उत्पन्न मिळाले. कमी क्षेत्रात उच्च मूल्याचे पीक घेतल्यास उत्पन्न कसे वाढते, याचे हे उदाहरण ठरले आहे.
स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास
घोगरे कुटुंबीयांनी परळी, सिरसाळा, दिंद्रुड, माजलगाव आणि अंबाजोगाई येथील बाजारपेठेत होलसेल दराने मिरची आणि आल्याची विक्री केली.
योग्य वेळ साधून विक्री केल्यामुळे दरांचा जास्तीत जास्त फायदा त्यांना मिळाला.
यशाची गुरुकिल्ली
* आधुनिक शेती पद्धती (मल्चिंग, ठिबक)
* खर्चाचे योग्य नियोजन
* बाजारपेठेचा अभ्यास
* दर्जेदार उत्पादनावर भर
* कुटुंबीयांची मेहनत व सातत्य
दीड एकरात घेतलेल्या मिरची आणि आल्याच्या पिकाने घोगरे कुटुंबीयांना लखपती करत मालामाल केले आहे. कमी क्षेत्रात उच्च मूल्याचे पीक घेऊन योग्य व्यवस्थापन केल्यास शेतीतूनही कोट्यवधींची स्वप्ने साकार होऊ शकतात, हे या यशकथेतून स्पष्ट झाले आहे.
वडील रघुनाथ घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेती करतो. नवनवीन उत्पादन घेण्याच्या कल्पनेतून मिरची आणि आल्याची लागवड केली. या वर्षी चांगला भाव मिळाल्याने लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले. सातत्य आणि सचोटीने काम केल्याचा आनंद आहे.- कैलास घोगरे, शेतकरी
हे ही वाचा सविस्तर :Farmer Success Story : सोयाबीननंतर बटाट्याची कमाल; तीन महिन्यांत २ लाखांची कमाई वाचा सविस्तर
अधिक वाचा : टरबूजाने केली कमाल; रिस्क घेतली अन् मिळाला मोठा फायदा वाचा सविस्तर
