नितीन कांबळे
जिद्द, आधुनिक शेती आणि सतत तांत्रिक प्रयोग या त्रिसूत्रीच्या जोरावर आष्टी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी हरुण शेख यांनी आपल्या केळी बागेला थेट इराणच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याचे मोठे यश मिळवले आहे. (Farmer Success Story)
आष्टी शहरातील प्रसिद्ध व्यापारी असलेले आणि शेतीबद्दल अपार प्रेम असलेले हरुण शेख यांनी आपल्या दूरदृष्टीवर भरोसा ठेवत घेतलेला धाडसी निर्णय आज त्यांना थेट इराणच्या बाजारपेठेत पोहोचवणारा टप्पा ठरला आहे.(Farmer Success Story)
तीन एकर शेतीतील ३००० केळीच्या झाडांपासून तब्बल २० टन निर्यातक्षम उत्पादन घेत, त्यांनी परदेशी बाजारपेठेतही आपला दर्जा सिद्ध केला. दरघटीमुळे नफा कमी झाला असला तरी, ५ लाखांचा निव्वळ लाभ मिळवत त्यांनी आधुनिक शेतीचे सामर्थ्य दाखवून दिले आहे.(Farmer Success Story)
आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
एक वर्षापूर्वी, शहरालगतच्या तीन एकर जमिनीत शेख यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरत ‘बी-किसान’ या उच्च प्रतीच्या वाणाच्या ३००० रोपांची लागवड केली.
ही रोपे त्यांनी खास मध्य प्रदेशातून आणली. योग्य लागवड, सूक्ष्मतपासणी, पाणी व्यवस्थापन, ठिबक सिंचन आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केळी बाग उत्तम तऱ्हेने वाढत गेली.
आज ही बाग दिमाखात उभी असून या ३००० झाडांपासून तब्बल ५० टन निर्यातक्षम केळीचे अपेक्षित उत्पादन मिळणार आहे.
२० टन केळी थेट इराणच्या बाजारात
शेख यांच्या केळी बागेचा दर्जा इतका उच्च प्रतीचा ठरला की, निर्यातदारांनी स्वतः पुढाकार घेत, त्यातील २० टन केळी थेट इराणच्या बाजारपेठेत पोहोचली.
आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा एक अभिमानाचा क्षण असून, प्रगतशील शेतीने परदेशी बाजार कसा गाठता येतो याचे हे जिवंत उदाहरण आहे.
मिळाला ५ लाखांचा नफा
या बागेसाठी शेख यांनी एकूण सुमारे ५ लाख रुपये गुंतवणूक केली होती. सुस्थितीत बाजारभाव असता त्यांना २५ लाख रुपयांचे एकूण उत्पन्न अपेक्षित होते.
मात्र, बाजारात झालेल्या अचानक दरघटीमुळे शेतकऱ्यांना नेहमी पडणाऱ्या फटक्याप्रमाणे त्यांनाही याचा परिणाम सहन करावा लागला. तरीदेखील, ५ लाखांचा निव्वळ नफा मिळणे हेही आजच्या स्थितीत आशादायी ठरले आहे.
इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन
दूरदृष्टी, आधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, दर्जेदार उत्पादन, परदेशी बाजाराची क्षमता या सर्व घटकांनी हरुण शेख यांना यश दिले.
तीन एकर जमीन, ३००० रोपे आणि २० टनांची निर्यात ही आकडेवारीच त्यांच्या प्रयत्नांची साक्ष देते. बाजार दर कमी असूनही त्यांनी जिद्द न सोडता शेती अधिक प्रगत कशी करता येते याचे जिवंत उदाहरण घातले आहे.
कायम शिकत रहा, प्रयोग करा आणि आधुनिक तंत्रज्ञानाला घाबरू नका. कष्टांची परतफेड नक्की होते. - हरुण शेख, शेतकरी
त्यांचा हा यशस्वी प्रयोग आता आष्टीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.
