अशोक अनगुलवार
कमी क्षेत्रातही आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि योग्य नियोजनाच्या मदतीने भरघोस उत्पन्न मिळवता येते, हे हिमायतनगर तालुक्यातील सिबंदरा गावातील अल्पभूधारक शेतकरी गजानन मारुती गारशेटवार यांनी सिद्ध करून दाखवले आहे.(Chilli Farming Success Story)
केवळ २० गुंठे जमिनीत मिरचीची लागवड करून त्यांनी तब्बल १ लाख ५० हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळवले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नगदी पिकांकडे वळण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे.(Chilli Farming Success Story)
सोयाबीननंतर घेतला मिरचीचा प्रयोग
गजानन गारशेटवार यांनी सुरुवातीला आपल्या शेतात सोयाबीनचे पीक घेतले होते. सोयाबीन काढणीनंतर उरलेल्या २० गुंठे क्षेत्रात त्यांनी मिरची लागवडीचा प्रयोग करण्याचे ठरवले.
सर्वप्रथम शेतात शेणखत टाकून चांगली मशागत करण्यात आली. त्यानंतर सुमारे १० हजार रुपयांचे बियाणे खरेदी करून घरच्या घरी मिरचीची रोपे तयार केली.
शास्त्रीय पद्धतीने लागवड
रोपे तयार झाल्यानंतर २ बाय दीड फूट अंतरावर त्यांची लागवड करण्यात आली. सुरुवातीला ड्रिप सिंचनाद्वारे हलके पाणी देण्यात आले.
पंधरा दिवसांनंतर झाडांच्या वाढीसाठी आवश्यक ते रासायनिक खतांचा वापर करण्यात आला. ठिबक सिंचनामुळे पाण्याचा योग्य वापर झाला आणि पिकाची वाढ चांगली झाली.
रोग व्यवस्थापनावर विशेष भर
यावर्षी अतिवृष्टी आणि ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता होती. त्यामुळे गारशेटवार यांनी परिस्थितीनुसार आठ दिवसांतून एक ते दोन वेळा फवारणी केली.
नियमित निरीक्षण करून रोग नियंत्रणावर भर दिला. पुढे झाडांना सरी मारल्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहिला आणि पाण्याच्या पाळ्याही कमी लागल्या.
भरघोस फुलधारणा आणि उत्पादन
वेळेवर पाणी, खतांचा संतुलित वापर आणि सातत्याने केलेल्या फवारणीमुळे मिरचीच्या झाडांवर मोठ्या प्रमाणात फुलधारणा आणि फळधारणा झाली.
हिरवी मिरची विक्री न करता त्यांनी ती पूर्णपणे पिकू दिली. त्यामुळे झाडांवर मिरचीचा मोठा भार आला आणि बागेत भरघोस उत्पादन दिसून आले.
उत्पादन आणि खर्चाचे गणित
मिरची लागवडीसाठी त्यांना सुमारे ७० हजार रुपयांचा खर्च आला. यामध्ये बियाणे १० हजार, फवारणी २० हजार, निंदणी १० हजार आणि तोडणीसाठी ३० हजार असा खर्च झाला. या लागवडीतून त्यांना १० क्विंटल ३५ किलो मिरचीचे उत्पादन मिळाले.
दीड लाखांचा निव्वळ नफा
बाजारात मिरचीला २०० रुपये प्रतिकिलो दर मिळाल्याने गारशेटवार यांना एकूण २ लाख ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वजा केल्यानंतर त्यांना सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला.
केवळ २० गुंठे क्षेत्रातून मिळालेला हा नफा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
गारशेटवार यांनी मिरची लागवड करताना शेतकरी ॲप, ऑनलाइन माहिती आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर केला.
बाजारातील दरांचा अभ्यास करून त्यांनी योग्य नियोजन केले. त्यामुळे कमी क्षेत्रातूनही चांगले उत्पादन मिळवणे शक्य झाले.
पुढील वर्षी क्षेत्र वाढवण्याचा मानस
मिरची लागवडीतील यशामुळे गारशेटवार यांचा आत्मविश्वास वाढला आहे. पुढील हंगामात सुमारे दीड एकर क्षेत्रात मिरचीची लागवड करण्याचा त्यांचा मानस आहे.
अल्पभूधारक शेतकरी असूनही जिद्द, नियोजन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या मदतीने गजानन गारशेटवार यांनी कमी क्षेत्रातूनही मोठे उत्पन्न मिळवून दाखवले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांना नगदी पिकांकडे वळण्याची प्रेरणा मिळत आहे.
शेती करताना बाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नगदी पिकांची लागवड केली तर कमी क्षेत्रातूनही चांगले उत्पन्न मिळू शकते. शेतकऱ्यांनी हताश न होता नवीन पद्धती स्वीकारल्या तर शेती नक्कीच फायदेशीर ठरू शकते. - गजानन गारशेटवार, शेतकरी
अधिक वाचा : Umed Scheme : राज्याचे 'बिझनेस मॉडेल'; 'उमेद'ने दिले महिलांच्या कर्तृत्वाला मोकळे आकाश
