Join us

सोयाबीन पेरणीसाठी बियाणे निवडताना उगवण क्षमता तपासणी का करावी? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 16:32 IST

सोयाबीन पिकाची सुदृढ आणि निरोगी वाढ होण्यासाठी तसेच त्यापासून चांगले उत्पादन मिळण्यासाठी सुधारित वाणांची निवड, बियाण्याची गुणवत्ता महत्वाची आहे.

सोयाबीन पिकाची सुदृढ आणि निरोगी वाढ होण्यासाठी तसेच त्यापासून चांगले उत्पादन मिळण्यासाठी सुधारित वाणांची निवड, बियाण्याची गुणवत्ता महत्वाची आहे.

सोयाबीनपेरणीसाठी बियाणे निवड◼️ सोयाबीन पिकाची सुदृढ आणि निरोगी वाढ होण्यासाठी तसेच त्यापासून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी, पेरणीसाठी वापरावयाच्या बियाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक असते.◼️ सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्क्यांहून जास्त असेल तर बियाण्याची गुणवत्ता चांगली असते व अशा बियाण्यापासून अंकुरण होऊन उगवून आलेले रोप निरोगी व सुदृढ तयार होते.◼️ सोयाबीनचे बियाणे इतर पिकाच्या बियांपेक्षा खूप नाजुक असते त्यामुळे त्याची मळणी, हाताळणी व साठवणूक करताना खूप काळजी घ्यावी लागते, अन्यथा बियाण्याच्या पापुद्र्याला इजा पोचते व त्याची उगवण क्षमता कमी होते.◼️ त्यामुळे गुणवत्तापूर्ण बियाण्याची निवड पुढील हंगामातील पेरणीसाठी करणे आवश्यक असते.

शेतकर्‍यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासणी का करावी?◼️ ऐन खरीप हंगामात सुधारित वाणांच्या बियाण्याचा तुटवडा आणि दरवर्षी बियाणे बदल यामुळे उत्पादन खर्चात वाढ होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते.◼️ जर शेतकर्‍यांनी उत्पादनातील छोटा हिस्सा पुढील हंगामात पेरणीसाठी राखून ठेवला तर त्यापासून उत्कृष्ठ पीक येऊन त्यापासून चांगले उत्पादन मिळू शकते.◼️ सोयाबीनच्या बियाण्याची गुणवत्ता ही हाताळणी आणि साठवणीच्या वेळी कमी होते.◼️ सोयाबीनच्या बियाण्याची गुणवत्ता कमी होण्याचे प्रमाण हे सोयाबीनचे वाण व साठवणुकीसाठी अवलंबविलेली पद्धत यांवर अवलंबून असते.◼️ बियाण्याची साठवण करताना योग्य ती सावधानता न बाळगल्यास जास्त नुकसान होते.◼️ बियाण्याच्या गुणवत्तेबद्दल प्राथमिक माहिती असल्यास शेतकरी असे बियाणे पेरणीसाठी वापरायचे की नाही याचा निर्णय स्वत: घेऊ शकतात.◼️ दरवर्षी पेरणीसाठी गुणवत्तापूर्ण बियाण्याची कमतरता भासते, त्यामुळे किमती बियाणे योग्य प्रमाणात पेरणीसाठी वापरले पाहिजे.◼️ बियाणे लॉटच्या गुवत्तेची पूर्व कल्पना असल्यास पेरणीसाठी योग्य बियाणे दर निश्चित करता येतो.◼️ बियाण्याच्या आकारानुसार मध्यम आकाराचे बियाणे असल्यास व बियाणे लॉटची उगवण क्षमता ७०% किंवा त्याहून जास्त असल्यास बियाणे दर प्रती हेक्टर ६२ ते ६५ किलो राखावा.◼️ जर बियाणे लॉटची उगवण क्षमता ७०% हून कमी असल्यास पेरणीसाठी प्रती हेक्टरी बियाणे दर वाढवावा.◼️ प्रत्येक एक टक्का उगवण क्षमता कमी झाल्यास शिफारस केलेल्या बियाणे दरामध्ये १ किलोने वाढ करून पेरणी करावी.◼️ परंतु शेतकरी स्वत:च्या अनुभवानुसार पेरणीसाठी क्षेत्राप्रमाणे बियाणे दर ठरवतात किंवा कमी/जास्त दराने पेरणी करतात.◼️ गुणवत्तापूर्ण व चांगली उगवण क्षमता असणारे बियाणे जास्त दराने पेरल्यामुळे किमती बियाण्याचे नुकसान होते व शेतामध्ये प्रती हेक्टरी जास्त रोपे उगवल्यामुळे पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही तसेच किडी व रोगांचा प्रादुर्भाव इ. समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता तपासून योग्य दराने पेरणी करणे आवश्यक आहे.

- श्री. एस. ए. जायभाय (शास्त्रज्ञ ड-कृषि विद्यावेत्ता)अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन संशोधन प्रकल्प, आघारकर संशोधन संस्था, पुणे

अधिक वाचा: बियाणे घरचे असो अथवा विकतचे, पेरणी अगोदर ही सोपी तपासणी कराच? वाचा सविस्तर

टॅग्स :सोयाबीनशेतीशेतकरीपीकपीक व्यवस्थापनखरीपपेरणीलागवड, मशागत