Tomato Nursery : रब्बी हंगामात सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करून ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात पुनर्लागवड केली जाते. साधारणपणे सरळ वाणांसाठी १६० ग्रॅम व संकरित वाणांसाठी ५० ग्रॅम बियाणे प्रति एकरसाठी पुरेसे होते.
- थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे चोळावे.
- त्यानंतर ॲझोटोबॅक्टर २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे.
- साधारणपणे १ एकर क्षेत्रावर लागवडीसाठी १.२ गुंठ्यांची रोपवाटिका पुरेशी असते.
- रोपवाटिकेची जमीन उभी-आडवी चांगली नांगरून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात.
- त्यानंतर ३ मीटर लांब, १ मीटर रुंद आणि १५ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत.
- गादीवाफ्यांमध्ये ५ किलो चांगले कुजलेले शेणखत, ८० ग्रॅम १९:१९:१९ किंवा १०० ग्रॅम १५:१५:१५ आणि २०० ग्रॅम निंबोळी पेंड चांगली मिसळावी.
- सोबत ट्रायकोडर्मा ५० ग्रॅम एकसारखे मिसळून घ्यावे.
- जेणेकरून रोपवाटिकेमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळला जाईल.
- गादीवाफ्यावर हाताने किंवा खुरप्याच्या साह्याने १० सें.मी. अंतरावर रेषा ओढून त्यामध्ये १ सें.मी. अंतरावर बी पेरावे.
- लगेच बी मातीने झाकून झारीने हलके पाणी द्यावे. साधारण ५ ते ८ दिवसांत बी उगवते.
- बी उगवेपर्यंत झारीने पाणी द्यावे. नंतर जमिनीच्या मगदुरानुसार पाटाने पाणी द्यावे.
- पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
- रोपे उगवल्यानंतर ६०-१०० मेश नायलॉन नेट किंवा पांढरे पातळ कापड २ मीटर उंचीपर्यंत मच्छरदाणी प्रमाणे गादीवाफ्यावर लावून रोपे झाकून घ्यावीत.
- रोपे २५ ते ३० दिवसांत पुनर्लागवडीसाठी तयार होतात.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी