Bhat Perani : घाट क्षेत्रात अवकाळी, पूर्व मान्सून तसेच मान्सूनच्या पावसामुळे रोपवाटिका तयार करता आल्या नसल्याकारणाने नियमित पावसावर पेरणाऱ्या तसेच आता पेरणी सुरु करणाऱ्या शेतकरी बांधवाना सल्ला देण्यात येतो कि शक्य असल्यास रहू पद्धतीने (रहूसाठी ८० ते १०० किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे.)
रहू तयार करताना भात बियाणे गोणपाटात बांधून २४ तास पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर बियाणे पाण्यातून बाहेर काढून २४ तास गोणपाटाच्या खाली-वर सुका पेंढा ठेवून त्यावर पाणी मारावे. अशा प्रकारे तयार केलेला आणि नुकताच मोड फुटलेला ४८ तासांचा रहू पेरणीसाठी वापरावा. पेरणी योग्य पाऊस पडलेल्या ठिकाणी खरीप हंगामासाठी रोपवाटिकेत बियाण्याची पेरणी गादीवाफ्यावर ३० जून पर्यंत पूर्ण करावी.
पुनर्लागवड पद्धतीमध्ये सुधारित जातीच्या वाणांचे बियाणे ३५ ते ४० किलो प्रति हेक्टरी वापरावे. तसेच संकरीत जातीसाठी प्रति हेक्टरी २० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाणास ४ ग्रॅम प्रति किलोग्रॅम याप्रमाणे कॅप्टाफॉल (७५ डब्लू.पी) बुरशीनाशक चोळावे. त्यानंतर अॅझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जीवाणू व अझोस्पिरीलम या जीवाणू खतांची २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.
रोपवाटीकेतील तण नियंत्रणासाठी १५ मिली ऑक्झीफ्लुरोफेन २३.५ टक्के ई.सी. १० लिटर पाण्यात पेरणीनंतर दोन ते तीन दिवसात फवारावे अथवा ब्युटाक्लोर ५० ई.सी १.५ किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टरी फवारण्यात यावे. रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रति गुंठा ५०० ग्रॅम नत्र खत द्यावे.
पीक संरक्षण
- रोपवाटिकेतील वाफ्यात खोडकिडीचे कामगंध सापळे प्रति हेक्टरी पाच या प्रमाणात लावावेत.
- रोपवाटिकेत वाफ्यात बियाणे टाकतेवेळी किंवा पेरणीनंतर १५ दिवसांनी दाणेदार क्लोरोपायरीफॉस १० टक्के (१० कि. ग्रॅ.) किंवा क्विनालफॉस ५ टक्के (१५ कि. ग्रॅ.) प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीत मिसळावे.
- खेकड्यांच्या बिळाशेजारी विषारी आमिष ठेवून खेकड्यांचे नियंत्रण करता येते. यासाठी एसिफेट ७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी (७५ ग्रॅ.) घेऊन १ कि. ग्रॅ. शिजवलेल्या भातामध्ये मिसळावे. या अमिषाचे १०० लहान लहान गोळे करून खेकड्यांच्या बिळात टाकावेत.
- (घाट क्षेत्रात जोरदार ते अत्यंत जोरदार पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता भात पिकाच्या रहू पद्धतीने किंवा रोपवाटिकेतील पेरण्या तसेच वरील सर्व कामे दोन ते तीन दिवसा पर्यंत पुढे ढकलावीत.)
नागलीसाठी काय सल्ला?
- पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतक-यांनी नागली पिकाची रोपवाटिका ८ दिवसांच्या अंतराने २ टप्प्यात तयार करावी.
- पेरणी योग्य पाऊस पडलेल्या ठिकाणी (जुलै चा दुसरा पंधरवडा पर्यंत) खरीप हंगामासाठी रोपवाटिकेसाठी बियाण्याची पेरणी गादीवाफ्यावर सुरु ठेवावी.
- बीजप्रक्रिया : बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रतिकिलो बियाण्यास ३ ते ४ ग्रॅम थायरम चोळावे.
- तसेच स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणास चोळावे.
- रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रति गुंठा १ किलो युरिया खत द्यावे.
- एक एकर क्षेत्र रोप पुनर्लागवडीकरीता २-३ गुंठे क्षेत्रावरील रोपवाटिका पुरेशी होते.
- (घाट क्षेत्रात जोरदार ते अत्यंत जोरदार पावसाचा अंदाज लक्षात घेता नागली पिकाच्या रोपवाटिकेतील पेरण्या तसेच वरील सर्व कामे दोन ते तीन दिवसा पर्यंत पुढे ढकलावीत.)
-ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी