चंद्रपूर : मान्सून महाराष्ट्रात (Monsoon Rain) काही भागात पोहोचला आहे. शेतकरी बांधवांची खरीप हंगामाची (Kharif Season) लगबग सुरू झालेली आहे. परंतु मान्सूनपूर्वी अवकाळी अनपेक्षित पाऊस जास्त पडल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे शेतकरी बंधू-भगिनींनो सोयाबीन (Soyabean) आणि तूर पिकांची पेरणी करताना गोंधळून न जाता या पिकांमध्ये सुधारित पट्टापेर पेरणी पद्धतीने पेरणी करा, असे आवाहन बल्लारपूर तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी केले आहे. याबाबत मार्गदर्शन किंवा मदत लागल्यास त्यांनी बल्लारपूर कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी चव्हाण यांनी केले आहे.
सुधारित पट्टापेर पद्धती म्हणजे सोयाबीनच्या ५ किंवा ६ किंवा ७रांगांनंतर एक रांग रिकामी ठेवणे होय. या रिकाम्या ठेवलेल्या रांगेमुळे सोयाबीनमध्ये पट्टे तयार होतात आणि या पट्टधातून शेतकऱ्यांना फिरणे, फवारणी करणे सोयीचे होते. सोयाबीन पिकाला हवा व भरपूर सूर्यप्रकाश योग्य प्रकारे मिळू शकतो आणि विशेष म्हणजे वाढीसाठी अंतर मिळते. त्यामुळे सामान्य पद्धतीपेक्षा आपोआपच उत्पादन वाढीस मदत होते.
या सुधारित पेरणी पद्धतीचा शंभर टक्के लाभ घ्यायचा असल्यास सोयाबीन पेरल्यानंतर २५ ते ३० दिवसांत या रिकाम्या सोडलेल्या पट्टीमध्ये डवऱ्याला दोरी बांधून दांड पाडणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या दांडामुळे पाऊस कमी झाल्यास पाणी मुरण्यास मदत होते व ओलावा टिकून राहतो. त्याचप्रमाणे पाऊस जास्त झाल्यास या दांडाद्वारे पाणी संथपणे वाहून जाण्यास मदत होते.
बल्लारपूर तालुक्यात सोयाबीन पिकाची पेरणी सुधारित पट्टापेर पेरणी पद्धतीने करण्यासाठी कृषी विभागामार्फत जनजागृती सुरू आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता यावर्षी मोठ्या प्रमाणावर पट्टापेर पेरणी पद्धतींनी पेरणी होणार आहे.
- श्रीधर चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, बल्लारपूर.