नाशिक : जिल्ह्यात सध्या हवामानात अचानक अनपेक्षित बदल दिसून येत आहेत. अनियमित तापमान आणि बदलती पर्जन्यमान परिस्थितीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. गहू, ज्वारी आणि बाजरी सारख्या महत्त्वाच्या धान्य पिकांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
हवामान विभागाच्या अहवालानुसार, निफाड, नांदगाव आणि येवला तालुक्यात अवकाळी पावसाच्या ढगांनी अचानक हवामान बदलले. यामुळे गहू आणि इतर रब्बी पिकांचे वाढणारे टप्पे बाधित झाले असून पिकांना नुकसान होत आहे. काही भागात तापमानातील बदलामुळे उभ्या पिकांचे नुकसानही नोंदले गेले आहे.
किडीचा प्रादुर्भाव
बदलत्या हवामानामुळे त्यांच्या पारंपरिक शेती वेळापत्रकात अडथळे निर्माण झाले आहेत. पेरणी व कापणीच्या वेळेत बदल झाल्याने रोग व हानीकारक किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे.
अशा करा उपाययोजना
रब्बी ज्वारी
कणसांमध्ये दाणे भरण्याचीअवस्था
पहिला पंधरवडा पक्ष्यांपासून संरक्षण करावे (पक्षीथांबे / मचाण बसविणे).
पाण्याच्या उपलब्धतेनुसार तिसरे पाणी द्यावे व पक्षांपासून संरक्षण करावे.
ज्वारी पिकाची कोळपणी व खुरपणी करुन पिक तणविरहीत ठेवावे
उपलब्ध जमिनीतील ओलाव्याच्या स्थितीनुसार कोळपणी करावी आणि कोळपणी नंतर तण काढणी करावी.
गहू
फुलोरा अवस्था / ओंबी लागण्याची अवस्था
सद्यःस्थितीत ओंब्या बाहेर पडल्या आहेत. अशावेळी वारा नसताना पाण्याची पाळी द्यावी. कारण त्यामुळे गहू लोळण्याची शक्यता असते. ओंब्या बाहेर पडल्यानंतर पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी देऊ नये. कारण त्यामुळे गव्हाच्या दाण्यांची चकाकी कमी राहून दर्जात घट होते.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन सेवा केंद्र, इगतपुरी
