Join us

Krushi Salla : मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हवामान सल्ला वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 18:07 IST

Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस वाऱ्याचा वेग, वादळी पाऊस आणि मेघगर्जनेसह हवामानातील बदल जाणवणार आहे. अशा बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाचे कृषी सल्ला दिला आहे. वाचा सविस्तर(Krushi Salla)

Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस वाऱ्याचा वेग, वादळी पाऊस आणि मेघगर्जनेसह हवामानातील बदल जाणवणार आहे. अशा बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाचा कृषी सल्ला दिला आहे. (Krushi Salla)

पीक लागवड, सिंचन, रोग-कीड नियंत्रण, तसेच पशुधन व्यवस्थापन यावर आधारित मार्गदर्शन शेतकऱ्यांना नुकसान टाळण्यास आणि उत्पादन वाढविण्यास मदत करणार आहे.(Krushi Salla)

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या अंदाजानुसार, २८ जूनपर्यंत मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह (३० ते ४० किमी/ताशी), मेघगर्जनेसह हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी, पीक संरक्षण आणि पशुधन व्यवस्थापनासाठी योग्य ती तयारी ठेवावी.(Krushi Salla)

सामान्य हवामान अंदाज 

२८ जूनपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

कमाल व किमान तापमानात फारसा फरक नाही.

बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असून, पीक व्यवस्थापनात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

पीक व्यवस्थापन सल्ला

कापूस : पेरणी न झालेल्या भागात ७५–१०० मिमी पावसाच्या नंतरच बिजप्रक्रिया करून पेरणी करावी. सूक्ष्म सिंचनाचा वापर करून पाणी द्यावे. अंतरमशागतीची कामे करावीत.

तूर : फायटोप्थोरा करपा टाळण्यासाठी तिन फूट खोल व दोन फूट रुंद चर शेताच्या चारही बाजूस काढावेत. पेरणीसाठी १५ जुलैपर्यंतची मुदत आहे.

मूग/उडीद : योग्य पावसाच्या नंतर बिजप्रक्रिया करून जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी पूर्ण करावी. तणनियंत्रण व सूक्ष्म सिंचन करावे.

भुईमूग/मका : पेरणी अनुक्रमे ७ जुलै आणि जुलै अखेरपर्यंत करता येईल. लागवडीनंतर सूक्ष्म सिंचन व तण नियंत्रण आवश्यक आहे.

फळबाग व्यवस्थापन

आंबा, केळी, सिताफळ लागवड : केवळ शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपे खरेदी करावीत. लागवडीनंतर ठिबक सिंचन आणि खत व्यवस्थापन करावे.

द्राक्ष : रोगग्रस्त पाने काढून टाकावीत, बगल फुटी हटवाव्यात, बांधणी करावी. योग्य फवारणी व ठिबक सिंचन करावे.

भाजीपाला व फुलशेती सल्ला 

गादी वाफ्यावर तण नियंत्रण करावे.

झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे.

काढणीस तयार असलेले पीक तातडीने काढावे.

पशुधन व्यवस्थापन

निवारा स्वच्छ व कोरडा ठेवावा.

गोठ्याच्या सभोवताली पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.

दर १५ दिवसांनी पोटॅशियम परमॅंगनेटने गोठा निर्जंतुक करावा.

(सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Oilseeds Unit : तेलबिया युनिटसाठी लाखोंचे अनुदान; शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची नवी योजना वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकृषी विज्ञान केंद्रमराठवाडापीकपीक व्यवस्थापन