Kharad Chatani : द्राक्ष खरड छाटणी (एप्रिल छाटणी) ही एप्रिलच्या पहिल्या ते तिसऱ्या आठवड्यात (साधारणतः १० ते २० ऑक्टोबर दरम्यान फळछाटणी झालेल्या बागेत) केली जाते. हे पुढील हंगामासाठी सूक्ष्मघड निर्मिती, काडी पक्वता आणि सशक्त फुटीसाठी आवश्यक आहे.
द्राक्ष खरड छाटणी
खरड छाटणी म्हणजे ओलांड्यावर असलेली काडी तळातून छाटणे होय. या वेळी ओलांड्यावर असलेली काडी एक डोळा राखून छाटावी. ज्या बागेत ओलांडा पूर्णपणे तयार झालेला नाही, तिथे ओलांड्याच्या शेवटी निघालेली काडी तारेवर वाकवून बांधून पाच ते सहा डोळ्यावर छाटणी घ्यावी.
जुन्या बागेत ओलांडा जास्त प्रमाणात डागाळला असल्यास त्या परिस्थितीत पूर्ण ओलांडा कापून घेता येईल. मागील हंगामातील काडी नवीन ओलांडा म्हणून वापरता येईल. अशा वेळी पाच ते सहा डोळ्यावर काडी कापून घ्यावी. बऱ्याचशा बागेत फुटी मागेपुढे निघण्याची समस्या दिसून येते. नेमकी खरडछाटणीवेळी झालेली चूक पुढे महागात पडू शकते. तेव्हा ओलांड्यावर फक्त एक डोळा राखून छाटणी घ्यावी.
एक सारखे व लवकर डोळे फुटण्यासाठी या वेळी हायड्रोजन सायनामाइडचा वापर महत्त्वाचा असतो. या रसायनाचा वापर जरी केला नाही, तरी डोळे मागे पुढे फुटतात.
साधारणतः २० ते २५ मिली हायड्रोजन सायनामाइड प्रति लिटर पाणी या प्रमाणात वापर करता येईल. नवीन ओलांडा तयार करतेवेळी हायड्रोजन सायनामाइडचा वापर नवीन काडीवर करणे टाळावे. या वेळी केवळ जुन्या ओलांड्यावर हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग करावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी
