Mango Fruit Drop : आंबा फळगळती (Mango Fruit Drop) ही प्रामुख्याने नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी ती ८०-९० टक्क्यांपर्यंत झाल्यास उत्पादनात मोठी घट होते. फळगळतीची नेमकी कारणे काय आहेत, हे थोडक्यात समजून घेऊयात...
आंबा फळगळतीची कारणे
संप्रेरके
फळधारणा झाल्यानंतर सुरुवातीस केवळ पेशी विभाजन होते. ते तीन आठवडयांत पूर्ण होऊन पेशींची अपेक्षित संख्या तयार झाल्यावर फळाचा आकार वाढीस लागतो. काही दिवसांनी त्यात बी वाढण्यास सुरुवात होते. या वेगवेगळ्या अवस्थेत फळ व फांदीमध्ये कमी-जास्त प्रमाणात ऑक्झिनची निर्मिती होते.
ऑक्झिन्स फांदीच्या तुलनेत फळात जास्त असतील तर फळगळ होत नाही. फळात ऑक्झिन कमी पडल्यास त्याच्या देठाजवळ एक चीर (अॅब्सिशन लेअर) पडते. त्यामुळे फळगळ होते. फळावर पडणारा सूर्यप्रकाश, तापमानवाढ, फळांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव अशा कोणत्याही कारणामुळे फळातील ऑक्झिनचा नाश होतो.
आंब्याची जात
ज्या जातीमध्ये देठ मजबूत असतो, त्यांत फळगळ कमी होते. देठ कमकुवत असणाऱ्या जातींमध्ये फळगळतीचे प्रमाण जास्त असते.
प्रतिकूल वातावरण
कमाल आणि किमान तापमानातील तफावत, आर्द्रतेमधील चढ-उतार यांमुळे फळांची गळ जास्त होते. ढगाळ वातावरण, बेमोसमी पाऊस, धुके यांमुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढूनदेखील फळगळ वाढते. फळे लहान असताना फेब्रुवारी-मार्च महिन्यात तापमान अचानक ३५ अंश सेल्सिसवर गेल्यास लहान फळांमधील ऑक्झिन नाश पावते, फळगळ वाढते.
कीड-रोग प्रादुर्भाव
फुलधारणा, फळधारणेच्या अवस्थेत तुडतुडे, फुलकिडे, अन्य रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्यास फळगळ होण्याची शक्यता असते. भुरीचे पांढरे आवरण तयार होऊन मोहोर आणि अविकसित फळे गळून पडतात. करपा रोगामुळे मोहोर आणि फळांचा देठ काळा पडून सुकतो. करप्यामुळे लहान फळांची मोठ्या प्रमाणावर गळ होते.
अन्नद्रव्य कमतरता
योग्य अवस्थेला व मात्रेत शिफारशीनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन केले नाही, तर पोषण अपुरे पडून फळगळ वाढते.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन सेवा केंद्र, इगतपुरी
