Krushi Salla : मागील काही दिवसांपासून मराठवाड्यातील हवामानात अनेक बदल होत आहेत. काही भागात अवकाळीच्या सरी बरसल्या. सध्या अवकाळी ढगांचे सावट घोंगावत आहे.
त्यात उन्हाळी भुईमुग, केळी, अंबा, द्राक्ष पिकांची कशी काळजी घ्यावी, यासंदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने काही शिफारशी जारी केल्या आहेत. त्या वाचा सविस्तर. (Krushi Salla)
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार १७ एप्रिल रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यात बीड, धाराशिव व छत्रपती संभाजी नगर, व १८ एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यात १९ एप्रिल रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात पुढील ४ ते ५ दिवसात कमाल तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची तर पुढील ३ ते ४ दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार १७ एप्रिल रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यात बीड, धाराशिव व छत्रपती संभाजी नगर व १८ एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यात १९ एप्रिल रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात पुढील ४ ते ५ दिवसात कमाल तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची तर पुढील ३ ते ४ दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात १८ ते २४ एप्रिलदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या दीर्घकालीन अंदाजानुसार, या हंगामातील नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा जास्त (१०४ टक्के दीर्घकालीन सरासरी) राहण्याची शक्यता आहे.
संदेश : वाढत्या तापमानामुळे व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
हळद : काढणीस तयार असलेल्या हळद पिकाची काढणी करून घ्यावी. काढणी केलेल्या हळद पिकाची उकडणे, वाळवणे व पॉलीश करणे ही कामे करून मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.
उन्हाळी भुईमूग : पिकात आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. भुईमूग पिकात आऱ्या सुटल्या नंतर अंतर मशागत करू नये. उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या (मावा, तुडतुडे, फुलकीडे व पांढरी माशी) किडींना आकर्षित करण्यासाठी एकरी १० ते १२ पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचे व लाल केसाळ अळीचे समूहातील अंडी लहान अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.
उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ५% निंबोळी अर्काची किंवा ॲझाडिरेक्टिन (३० पीपीएम) ३ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी : घड लागलेल्या केळी झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. केळी बागेस आवश्यकतेनुसार सरी वरंब्याने पाणी द्यावे.
जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या केळीच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी.
आंबा : काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी करून घ्यावी. आंबा बागेत पाण्याचा ताण बसल्यामुळे फळगळ होऊ शकते, फळगळ होऊ नये म्हणून आंबा बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या आंब्याच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी.
द्राक्ष : काढणी राहिलेल्या द्राक्ष फळांची काढणी करून घ्यावी. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीची पुर्व तयारी करून घ्यावी. द्राक्ष बागेतील माती मोकळी करून खत व्यवस्थापन करावे.
द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी १५ एप्रिल ते १५ मे या दरम्यान करावी. पाऊस पडण्याची शक्यता असल्यास एप्रिल छाटणी पुढे ढकलावी.
भाजीपाला
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. नविन लागवड केलेल्या रोपांना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन ५% + फेनप्रोपाथ्रीन १५% १० मिली किंवा डायमेथोएट ३०% १३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी.
(सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
हे ही वाचा सविस्तर : Krushi Salla: वादळी वाऱ्यात पिकांचे कसे करावे नियोजन वाचा कृषी सल्ला सविस्तर