Join us

शेतकरी बांधवांनो दुष्काळ सदृश्य परिस्थितीत अशी घ्या फळबागेची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 9:23 PM

कृषी विज्ञान केंद्राचा मोलाचा सल्ला

सध्या सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक शेतकरी बांधवांची फळबागेचे व्यवस्थापन करतांना फजेती होत असून पाण्याअभावी नाईलाजस्तव फळबाग हातून सोडून द्यावी लागत आहे. मात्र पुढील काही पद्धतींचा उपयोग करून फळबागेला जीवंत ठेवता येईल. यासाठी हा लेख पूर्ण वाचा. 

ठिबक सिंचन पद्धती 

उन्हाळ्यामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. या पद्धतीत इतर प्रचलित पद्धतीपेक्षा ५० ते ६० टक्के पाण्याची बचत होते. उत्पादनात २० से १५ टक्के वाढ मिळू शकते. तसेच या पद्धतीमुळे झाडांच्या गरजेनुसार पाणी मोजून देता येते व पाण्याचा अपव्यय होत नाही.

जैविक आच्छादन

जैविक आच्छादनाकरीता पालापाचोळा, लाकडी भुसा, वाळलेले गवत, उसाचे पाचट, सोयाबीनचा भुसा, गव्हाचे काड अशा सेंद्रिय संसाधनांचा वापर करावा. जैविक आच्छादनाची जाडी १२. ते २५ सें.मी. असावी. जैविक आच्छादनामुळे उन्हाळ्यात दोन पाण्याच्या पाळयातील कालावधी वाढवता येतो व जमिनीचे तापमान नियंत्रित होते.

मडका सिंचन पद्धती

२ ते ३ वर्षाच्या झाडांसाठी ५ ते ७ लिटर तर मोठ्या झाडांसाठी १० ते १५ लिटर पाणी बसणारी मडकी वापरावीत. मडकी छिद्रांकित व कमी भाजलेली असावीत. भाजलेल्या मडक्याच्या खालील बाजूस छिद्र पाडून त्यामध्ये कापडाची चिंधी किंवा नारळाची शेंडी बसवावी.

बाष्परोधकांचा वापर

पानातून वाया पणर्णोत्सर्जनाद्वारे जाणारे पाणी वाष्परोधकांचा वापर करून कमी करता येते. पर्णरंद्रे बंद करणारी फिनील मरक्यूरी अॅसिटेट, अॅचसिसिक अॅसिड तर पानावर पातळ थर तयार करणारे केओलीन, सिलिकॉन ऑईल, मेण इत्यादी बाष्परोधकांचा वापर करावा.

बोर्डोपेस्टचा वापर

उन्हामुळे झाडातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे खोडावरील साल तडकून बुरशीजन्य रोगांपासून सरंक्षण करण्यासाठी खोडाला बोडोपेस्ट लावावी. १ ते २ मीटर उंचीपर्यंत बोडों पेस्ट लावावी, बोडोपेस्ट लावण्याने सूर्यकिरण परावतीत होतात, खोडाचे तापमान कमी राहते, साल तडकत नाही.

खतांची फवारणी

उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी होऊन पानात कमी अन्नांश तयार होतात. यावेळी ०१ % टक्का पोटॅशियम नायट्रेट व ०२ टक्के डीएपी यांची २५- ३० दिवसाच्या अंतराने एक आड एक फवारणी करावी. ज्यामुळे अन्नांश तयार होण्याची क्रिया गतिमान होऊन झाडे जमिनीतील ओलावा शोषण्यास सुरुवात करतात.

सौजन्य : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१

टॅग्स :दुष्काळशेतीशेतकरीफळेपीक व्यवस्थापन