संजय लव्हाडे
सोयाबीन खरेदीसाठी २४ दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतरही सरकारने सोयाबीनची खरेदी बंद केली. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तुरीची नोंदणी सुरू असली तरी त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही. तूर आणि खाद्यतेलांच्या दरात तेजी आली असून, सोने-चांदीचे दर किंचित घसरले आहेत.
महाराष्ट्रातील खासदारांच्या मागणीची दखल घेऊन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीसाठी २४ दिवसांची मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती.
मात्र, सोयाबीनची खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. जालनाबाजारपेठेत सोयाबीनची आवक १७०० पोती इतकी असून, भाव ३२०० ते ४८०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
हमीभाव खरेदी अंतर्गत राज्यात प्रतीक्षेत असलेली तूर खरेदी अखेर सुरू करण्याचे आदेश दाखल झाले आहेत. या वर्षात राज्याला दोन लाख ९७ हजार ४३० टन तूर खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
त्यानुसार जिल्हानिहाय उत्पादकता निश्चित करून खरेदीची मर्यादा नेमून देण्यात आली आहे. सरकारने यंदा तुरीसाठी ७ हजार ५५० रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र, सध्या बाजारात ७ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
तुरीच्या दरात २०० ते ३०० रुपयांची तेजी असून, काळ्या तुरीच्या दरात तर विक्रमी भाववाढ झाली आहे. जालना बाजारपेठेत पांढऱ्या तुरीची आवक ३५०० पोती इतकी असून, भाव ६२०० ते ७८०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
लाल तुरीची आवक ५०० पोती इतकी असून, भाव ७००० ते ७४५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. काळ्या तुरीची आवक ५० पोती असून, भाव ९५०० ते ११०५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
सोने, चांदी स्वस्त
• गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव दररोज वाढत होता. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करण्याच अधिक अडचणी येत होत्या.
• सध्या लग्न समारंभ सगळीकडे दणक्यात सुरू असताना सोन्याचे दर कमी झाल्याने सोने खरेदी करण्याची शक्यता जास्त असणार आहे.
• जालना बाजारपेठेत सोने ८६,५०० रुपये प्रति तोळा आणि चांदीचा दर ९७ हजार रुपये प्रति किलो असा आहे.
कृषी माल बाजारभाव
गहू | २७७५ ते ४५०० |
ज्वारी | २१०० ते ३४०० |
बाजरी | २२०० ते ३००० |
मका | १६७० ते २१५० |
हरभरा | ५४०० ते ५६०० |
गुळ | २६०० ते ३७०० |
साखर | ४०५० ते ४२०० |