जळगाव : एकेकाळी ३०० ते ४०० रुपये किलो दराने विकला जाणारा शेवगा सध्या अवघ्या १० ते २० रुपये किलोने विकला जात आहे. यंदा प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात मोठी घट झाल्याने आणि बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे.
शेवगा हे पूर्णपणे हवामानावर अवलंबून असलेले पीक असून फुलोऱ्याच्या अवस्थेत पाऊस, ढगाळ वातावरण आणि धुके यांचा मोठा परिणाम होतो. या परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर फुलगळ होत असल्याने शेंगा तयार होत नाहीत. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात मागणी जास्त असूनही उत्पादन कमी राहते आणि दर २०० ते ४०० रुपये किलोपर्यंत जातात. मात्र, सध्या परिस्थिती उलट असून, मार्चअखेरीस शेवग्याचा दर १५ ते २० रुपये किलोपर्यंत खाली आला आहे.
गेल्यावर्षी याच काळात दर ५ ते १४ रुपये किलोदरम्यान होते, तर यंदा सुरुवातीला चांगला दर मिळाल्यानंतर अचानक घसरण झाली आहे. शेवग्याच्या फुलोऱ्यावेळी मधमाश्यांद्वारे परागीभवन होणे अत्यंत आवश्यक असते. सध्या पुणे मार्केटमध्ये ७ हजार रुपये क्विंटल, छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये १८५० रुपये क्विंटल, मुंबई मार्केटमध्ये २५०० रुपये प्रति क्विंटल, अकलुज मार्केटमध्ये १५०० रुपये क्विंटल सुरु आहेत.
खराब हवामानामुळे यंदा शेवग्याचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादन घटले असले, तरी पुढील काही दिवसांत दर वाढण्याची शक्यता आहे.
- दर्शन गेंद (लोणारी), शेवगा व्यापारी, मालेगाव
प्रथमच यंदा शेवगा लागवड केली. उत्पन्नही बऱ्यापैकी आले मात्र त्यातून उत्पादनाचा खर्च निघाला; सध्या भाव कोसळले आहेत. कमी झालेल्या दरामुळे मजुरी व वाहतूक खर्चही निघत नाही.
- विठ्ठल लहू महाजन, शेतकरी, गुळे
हेही वाचा : शेळ्यांचे दूध आणि वजन वाढविण्यासाठी 'या' झाडांचा पाला खाऊ घाला, वाचा सविस्तर
