Join us
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार तूर खरेदी करणार, बाजारभाव अकरा हजारावर जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 09:51 IST

यावर्षी पावसाने तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाजारात तुरीची आवक कमी असणार आहे. अशातच यावर्षी केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून बाजारभावाने ८ ते १० लाख टन तूर खरेदी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

यावर्षी पावसाने तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाजारात तुरीची आवक कमी असणार आहे. अशातच यावर्षी केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून बाजारभावाने ८ ते १० लाख टन तूर खरेदी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत तुरीचे दर ११ हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता व्यापारी व अभ्यासकांनी वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तूर विकण्याची घाई न केलेलीच बरी राहणार आहे.

सरकार निवडणुकीच्या तोंडावर सर्व शेतमालांचे दर कमी करत आहे. परंतु तुरीचे नाही. देशातील कमी उत्पादन आणि आयातीवरील मर्यादेमुळे सरकारने हा निर्णय घेतला नसून, खुल्या बाजारात तूर खरेदीची तयारी केंद्र सरकार करीत असल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु, सरकार किती तूर खरेदी करणार याचा निश्चित आकडा समोर आला नाही. केंद्रीय सहकार विभागाने यापूर्वी ८ ते १० लाख टन खरेदीचे उद्दिष्ट आहे, असे सांगितले होते. साहजिकच सरकार इतकी तूर खरेदी करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांत सद्यस्थितीतच तुरीला कमाल नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर मिळत आहेत.

तूर आयातीमुळे घटले दरकेंद्र सरकारने तूरडाळीच्या वाढलेल्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी तूर आयात केली होती. त्यामुळे दरात नरमाई निर्माण झाली आणि डाळींचे दर प्रतिकिलो १३० रुपयांवर आल्याने सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे तूर उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

बाजाराचा आढावा घेऊन 'नाफेड' रोज भाव जाहीर करणारसरकारसाठी 'नाफेड' आणि 'एनसीसीएफ' बाजारभावाने तूर खरेदी करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास यंदा हमीभाव ७ हजार रुपये असला तरी 'नाफेड'कडून शेतकऱ्यांना बाजारभाव मिळणार असून, खुल्या बाजाराचा आढावा घेऊन नाफेडकडून रोज त्यांचे भाव जाहीर करण्यात येणार आहेत.

केंद्र सरकार खुल्या बाजारात तूर खरेदीसाठी सज्ज आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तुरीचे दर ११ हजार रुपये प्रती क्विंटलचा टप्पा गाठण्याची दाट शक्यता आहे. अशात शेतकऱ्यांनी तूर विक्री थांबविणे योग्य ठरेल. - प्रवीण साबू, व्यापारी, कारंजा

टॅग्स :बाजारमार्केट यार्डतूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीपाऊस