पुरुषोत्तम करवा
मागील एका महिन्यात मसाले व काही सुकामेव्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. खोबरे १४० रुपये तर किसमिस २५० रुपये किलोप्रमाणे वाढले असून, नागकेशर, वेलची, अंजीरसह अनेक पदार्थाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भाववाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार आहे.
एक महिन्यापूर्वी खोबऱ्याचे भाव २२० रुपये किलो होते. हे दर दिवसेंदिवस वाढत गेले. शुक्रवारी तर खोबऱ्याचे भाव ३६० रुपये किलो झाले होते. हे दर ७० टक्क्यांपर्यंत वाढले. काही दिवसांत खोबरे ४०० रुपयांना मागे टाकील, असा अंदाज व्यापाऱ्यांना आहे.
मसाल्यांचाही तडका
ड्रायफूटच्या दरवाढीबरोबरच काही मसाल्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. ८५० चा शहाजिरा आता एक हजार रुपये किलो झाला आहे. १४०० चा नागकेशर २००० हजार रुपये झाला आहे. २८०० रुपये किलो वेलचीचा भाव ३६०० रुपये किलो झाला. ही दरवाढ गत दोन आठवड्यांत झाल्याचे व्यापारी म्हणाले.
सुका मेव्याचे दरही वाढू लागले
किसमिसचे भावदेखील २२० रुपये होते. सध्या ५५० रुपये किलोप्रमाणे झाले आहेत. अंजीरच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, १८०० रुपयांनी विकले जाणारे अंजीर आता २४०० रुपये किलो झाले आहेत.
सणासुदीच्या तोंडावर पेंडखजूरही महागला
काही दिवसांनी सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत. या काळात पेंडखजूरला चांगलीच मागणी असते. १५० रुपयांना मिळणारे पेंडखजूरचे पाकीट आता २०० रुपयांना झाले आहे. हा भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.
काही मसाले व सुकामेव्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच काही मसाले व सुकामेव्याचे भाव युद्धामुळे वाढले आहेत. येत्या काही दिवसांत हे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. - शेख उबेद शेख हशम, मसाले व ड्रायफूटचे व्यापारी, माजलगाव जि. बीड.