जालना : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम थेट खाद्यतेलाच्या बाजारावर दिसून येत असून, दीर्घकाळ स्थिर असलेले खाद्यतेलाचे दर अलीकडे वाढले आहेत. विशेषतः सोयाबीन उत्पादनावर अतिवृष्टीचा फटका बसल्याने सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे.
त्यासोबतच केंद्र सरकारने खाद्यतेलावर लावलेले २० टक्के आयात शुल्क, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि डॉलरच्या वाढत्या दरामुळेही खाद्यतेल महाग झाले आहे. जालना शहरातील बाजारपेठेत सध्या सोयाबीन तेल १४६ रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. पाम तेलाचा दर १४१ रुपये प्रतिकिलो असून सूर्यफूल तेलाला १८० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे.
आता सर्वाधिक भाव शेंगदाणा तेलाचा वाढला
जालना शहरात सर्वाधिक दरवाढ शेंगदाणा तेलात झाली असून, १८० वरून प्रतिकिलो २३० रुपयांवर भाव पोहोचले आहेत. मर्यादित आवक आणि मागणी वाढल्याने दर चढले. गेल्या अनेक दिवसांपासून खाद्यतेलाचे दर स्थिर होते. मात्र, अलीकडे एकाच वेळी विविध कारणांमुळे अचानक दरवाढ झाल्याचे चित्र बाजारात दिसत आहे.
तेलातील दरवाढीमागे काय कारणे ?
सध्या कोणताही सण किंवा लग्नसराई नसतानाही खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून बाजारपेठेत चर्चेला उधाण आले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, सोयाबीनचे घटलेले उत्पादन, आयात शुल्कवाढ, महागडा डॉलर आणि जागतिक बाजारातील अस्थिरता ही प्रमुख कारणे आहेत.
जागतिक घडामोडींचा आयातीवर परिणाम
जागतिक बाजारातील तणाव, कच्च्या तेलाचे दर आणि डॉलरमधील वाढ याचा थेट परिणाम खाद्यतेल आयातीवर झाला असून खर्च वाढला आहे. याशिवाय सरकी तेल १४४ रुपये, करडी तेल तब्बल ३९० रुपये, तर शेंगदाणा तेल २३० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. आयातीवरील निर्बंध कमी न झाल्यास व उत्पादनात सुधारणा न झाल्यास आणि आयात खर्च वाढत राहिल्यास पुढील काळात खाद्यतेलाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
