नाशिक : ज्या शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्यात टरबूज लागवड केली आहे, अशा शेतकऱ्यांकडील टरबूज काढणीला आले आहे. मात्र, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे टरबूज पिकाला फटका बसत असून, या फळांवर चट्टे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रकारामुळे बाजारात टरबूजचा दर्जा घसरून भाव कमी होऊ नये, यासाठी शेतकरी टरबूज फळांवर गोणपाट, बारदानाचे आच्छादन टाकावे लागत आहे.
अनेक शेतकऱ्यांनी टरबूज पिकासाठी एकरी सरासरी ५५ ते ६० हजार रुपयांचे भांडवल गुंतवले आहे. बियाणे, ठिबक सिंचन, खते, औषधे आणि मजुरी यावर मोठा खर्च झाल्याने उत्पादन वाचवणे अत्यावश्यक ठरले आहे.
सध्या सरासरी २२ रुपये प्रति किलो दर
तीव्र उन्हामुळे टरबुजाच्या सालीवर डाग पडतात, फळाचा रंग बदलतो आणि वजनात घट होते. त्यामुळे व्यापारी दर कमी करतात. टरबुजांची प्रत चांगली रहावी, तसेच दर कमी होऊ नये म्हणून टरबूजाच्या संरक्षणासाठी गोणपाट किंवा इतर आच्छादन आदी उपाययोजना करत आहे. सध्या सरासरी २२ रुपये प्रति किलो दर असून, ज्या शेतकऱ्यांचे टरबूज अजून ८ ते १० दिवसांत निघणार आहे, असे शेतकरी उन्हापासून टरबूज वाचविताना दिसत आहे.
समाधानकारक दर
सध्या बाजारात २० ते २२ रुपये प्रतिकिलो असा समाधानकारक दर असला तरी उन्हामुळे फळांवर पडणारे चट्टे आणि करपणे यामुळे दर्जा घसरून दर कमी होण्याच्या भीतीने शेतकरी टरबूजांवर आच्छादन टाकत आहेत.
एक एकर क्षेत्रात जवळपास एकूण ७० हजार खर्च करून यंदा टरबूज पिकाची लागवड केली. सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. उन्हाचा फटका फळावर बसू नये, म्हणून बारदाण्याचे आच्छादन टाकण्याचे काम सुरू आहे. आठ दिवसांत फळ विक्रिसाठी तयार होईल. बाजारात अपेक्षित भाव मिळावा ही अपेक्षा.
