वाशिम : सण-उत्सवांची मालिका, आर्थिक वर्षअखेरची लगबग आणि नाणेटंचाई या तिहेरी कारणांमुळे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल खरेदीचे व्यवहार ५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Washim APMC Market)
त्यामुळे पुढील सुमारे १५ दिवस बाजार समितीतील व्यवहार पूर्णपणे ठप्प राहणार असून, शेतकरी, व्यापारी आणि अडते यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.(Washim APMC Market)
रोकड टंचाईमुळे व्यवहार ठप्प
बाजार समिती प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुढीपाडवा, रमजान ईद, शासकीय सुट्ट्या तसेच मार्चअखेरमुळे बँक व्यवहारांवर परिणाम झाला आहे. परिणामी व्यापारी आणि अडत्यांना देयके करण्यासाठी आवश्यक रोकड उपलब्ध होत नसल्याने त्यांनी खरेदी व्यवहार तात्पुरते बंद ठेवण्याची मागणी केली होती. त्यानुसार बाजार समितीने हा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांना आवाहन
या कालावधीत शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अन्यथा मालाची आवक स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कारंजा बाजार समितीही बंद
कारंजा (लाड) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहारही सणांच्या पार्श्वभूमीवर काही दिवस बंद ठेवण्यात आले आहेत.
२० मार्च : हमाल कामगार अनुपस्थित
२१ मार्च : रमजान ईद – बाजार बंद
रविवारी सुट्टी असल्याने सोमवारपासून व्यवहार पूर्ववत होणार आहे.
शेतकऱ्यांची अडचण वाढणार
सध्या शेतकरी उन्हाळी हंगामातील कामांमध्ये व्यस्त असून, अनेकजण खरीप हंगामासाठी तयारी करत आहेत.
याच काळात आर्थिक वर्षअखेर असल्याने देणी-घेणी आणि कर्जफेडीसाठी निधीची गरज भासत आहे. अशा वेळी बाजार समितीतील व्यवहार बंद राहिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
व्यापाऱ्यांनाही फटका
व्यापारी व अडत्यांचेही व्यवहार ठप्प झाल्याने त्यांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. रोकड प्रवाह थांबल्यामुळे संपूर्ण बाजार व्यवस्थेवर याचा परिणाम होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Halad Export : दुबईला जाणारी हळद थांबली! दर २,५०० रुपयांनी कोसळले, वाचा कारण
अधिक वाचा : Tur Bajarbhav : तूर ८ हजाराच्या उंबरठ्यावर ; ‘या’ ठिकाणी अजूनही कमी दर
