अमरावती : खासगी बाजारात सोयाबीनने हमीभावाचा टप्पा पार केल्यामुळे शासन खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ असल्याचे दिसून येते. 'नाफेड'च्या यंत्रणा असलेल्या डीएमओ व व्हीसीएमएफ यांच्याद्वारा शेड्यूलिंग करण्यात आले. मात्र, खासगीत दर जास्त व नगदी पेमेंट असल्याने शेतकऱ्यांचा कल नाही. त्यामुळे शासन खरेदी केंद्रे ओस पडली आहेत.
सोयाबीनची खरेदी सुरु झाल्यापासून पुढे ९० दिवस शासन दराने खरेदी करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले होते. त्यानुसार ही मुदत १२ फेब्रुवारीला संपत आहे. सुरुवातीच्या काळात सोयाबीन खरेदीची गती कमी होती. आता खुल्या बाजारात सोयाबीनचे दर ५३२८ रुपये हमीभावापेक्षा जास्त असल्याने नाफेड केंद्रांची आवक बंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १६ ही खरेदी केंद्रे गुंडाळल्याचे चित्र सध्या आहे.
यावर्षी नाफेडने खरेदी केंद्र उशिरा सुरू केली व त्यातही १२ टक्क्यांच्या आत आर्द्रता व एफएक्यू ग्रेडसह अन्य अर्टीचा भरणा होता. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात सोयाबीन विकावे लागले होते. त्यानंतरही शेड्युलिंग कमी झाल्याने खरेदीची गती मंदावली होती. दरम्यान, खासगी बाजारात सोयाबीनची चमक वाढली, त्यामुळे महिनाभरापासून केंद्रांवरील आवक बंद झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांकडे आता साठवणुकीतील सोयाबीन नाही. त्यामुळे दरवाढीचा फायदा हा व्यापाऱ्यांनाच होत आहे.
सोयाबीनचे बाजारभाव
- ३० जानेवारी ५१०० रुपये ते ५७०० रुपये
- ०२ फेब्रुवारी ५१०० रुपये ते ५५५५ रुपये
- ०४ फेब्रुवारी ५१५० रुपये ते ५६०० रुपये
- ०६ फेब्रुवारी ५१५० रुपये ते ५५२० रुपये
- ०९ फेब्रुवारी ५१०० रुपये ते ५४७६ रुपये
सोयाबीन दरवाढीची कारणे
यंदा पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले व कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. शेतकऱ्यांजवळ सोयाबीन नसल्याने आवक कमी झाली. खाद्यतेल उद्योग व पशुखाद्य निर्मितीसाठी सोयापेंडची मागणी वाढली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेल व पशुखाद्य डीओसीच्या दरात तेजी, या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम होऊन सोयाबीनची दरवाढ झाली आहे.
Harbhara Market : हरभरा हमीभाव गाठणार का, फेब्रुवारीचे उर्वरित 20 दिवस कसे असतील दर
